चिपळूण : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील चिपळूण-कराड रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. याची आपल्याला जाणीव आहे. या प्रलंबित प्रकल्पासाठी आपण केंद्रीय रेल्वेमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री यांची लवकरच भेट घेणार आणि हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अनुभवाची व प्रयत्नांची पराकाष्ठा करणार, असे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व रायगड-रत्नागिरीचे खा. सुनील तटकरे यांनी दिले. चिपळूण येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सावर्डे येथे जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत चिपळूणचे माजी सभापती व अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी या संदर्भात राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता.
या संदर्भात मुकादम बैठकीत म्हणाले, चिपळूण-कराड रेल्वेमार्गाचा प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठा फायदा होऊ शकतो. तसेच मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे ही कराड येथे एकत्र येऊ शकते. त्याचा फायदा या दोन्ही रेल्वेमार्गांना होऊ शकतो. आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण-कराड रेल्वे मार्गाच्या कामाचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन देखील केले होते.
मात्र, त्यानंतर हा प्रकल्प प्रलंबित आहे. आम्ही त्या भूमीपूजन कार्यक्रमाला उपस्थित देखील होतो. जवळपास १०० कि.मी.चा हा प्रकल्प असून शासनावर फार मोठा आर्थिक बोजा पडणार नाही. कोकण रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले, त्यावेळी हा प्रकल्प तोट्यात जाईल, असे बोलले जात होते. तरीही कर्जरोखे उभारून कोकण रेल्वे पूर्ण करण्यात आली आणि आता हीच कोकण रेल्वे नफ्यात चालली आहे. प्रवासी संख्या वाढत आहे. त्याच धर्तीवर चिपळूण-कराड रेल्वे मार्ग झाल्यास भविष्यात हा मार्गदेखील फायद्यात येईल. पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादने कोकणात आणि कोकणातील उत्पादने पश्चिम महाराष्ट्रासह देशभरात जाण्यासाठी मोठा मार्ग मोकळा होईल, अशी भूमिका मुकादम यांनी या बैठकीत मांडली.
१० मार्चपर्यंत रेल्वेमंत्र्यांसोबत बैठक
चिपळुणातील सभेनंतर पत्रकारांशी बोलताना खा. तटकरे म्हणाले, चिपळूण-कराड रेल्वे मार्गाबाबत आपण येत्या १० तारखेपर्यंत बैठकीचे आयोजन करू. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांना निमंत्रण देऊ. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊ. एखादा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी त्याचा कसा पाठपुरावा करायचा, कसा पत्रव्यवहार करायचा याचा अनुभव आहे. याच अनुभवाच्या जोरावर प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असे खा. तटकरे यांनी यावेळी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 22/Feb/2025
