दापोलीतील मांदिवली येथील ग्रामस्थ विधिमंडळावर धडकले

दापोली : ‘अवैध मायनिंग हटाव’च्या मागणीसाठी दापोली तालुक्यातील मांदिवली येथील ग्रामस्थ विधिमंडळावर धडकले आहेत तर मायनिंगच्या या त्रासाबाबत येथील ग्रामस्थ मुंबईत आक्रमक होताना दिसले. या वेळी ग्रामस्थ फलक हातात घेऊन ही अवैध मायनिंग हटविण्याची मागणी करत आहेत. या बाबत येथील मायनिंग विरोधी कार्यकर्ते भावेश कारेकर यांनी ही माहिती दिली आहे.

अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी हे ग्रामस्थ मुंबईत धडकले आहेत. या मायनिंग हटाव बाबत येथील ग्रामस्थांनी शासनाकडे न्याय मागितला होता. मात्र, स्थानिक जिल्हा प्रशासन यांनी येथील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली नसल्याने शेवटी या ग्रामस्थांनी विधिमंडळाची पायरी गाठली आहे. या पूर्वी २०२३ ला या ठिकाणी जनसुनावणी झाली होती. ही जनसुनावणी स्थगित झाली होती.

जनसुनावणी स्थगित होऊनही जिल्हा प्रशासनाने या मायनींग प्रकल्पाला परवानगी दिली आहे. निसर्गसंपदा असताना या ठिकाणी झाडतोड करावी लागणार नाही, असे शासनाने रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी झाडतोड सुरू आहे, असे कारेकर सांगत आहेत तर या मायनींगला राजकीय पाठबळ आहे म्हणून या ठिकाणी कारवाई होत नाही. सरकारने परवानगी दिली किंवा नाही दिली तरी ही आम्ही हा प्रकल्प चालविणारच, अशी दंडेलशाई या ठिकाणी सुरू आहे.

केंद्रशासनाने या प्रकल्पावर कारवाई करा, म्हणून आदेश दिले आहेत मात्र, स्थानिक प्रशासन ही कारवाई करत नाही. या प्रकल्पासंदर्भात शेतकऱ्यांना धमकावले जात आहे. मग प्रशासन आणि पोलिस गप्प का, असा ही सवाल कारेकर यांनी उपस्थित केला आहे. या मायनिंग हटाबाबत आम्ही दीड वर्ष लढतोय; मात्र न्याय मिळत नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 07/Mar/2025