बुध्दगया महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात द्या; बुध्दिस्ट सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी महासंघ, रत्नागिरी ची मागणी

रत्नागिरी : बिहार राज्यातील बुध्दगया महाबोधी विहार हे तथागत भगवान गौतम बुध्दांचे ज्ञान प्राप्ती स्थळ आहे. महाबोधी विहार हे जगभरातील बौध्दांचे सर्वोच्च पवित्र स्थान आहे. त्या पवित्र स्थानावर संपूर्ण व्यवस्थापन बौध्दांच्या ताब्यात असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत सदर महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात मिळण्यासाठी अखील भारतीय भिक्षु संघ, बौध्द समाजाच्या विविध सामाजिक आणि धार्मिक संघटना दि. १२ फेब्रुवारी २०२५ पासून उपोषण, धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने आणि संविधानीक मार्गाने केंद्र सरकार व बिहार सरकारचे लक्ष वेधण्याचे सतत प्रयत्न करीत आहेत.

परंतु केंद्र व बिहार राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आंदोलकांना त्यांचे अधिकारापासून वंचित ठेवून शांततेने चाललेले आंदोलन उधळून लावण्याचे काम प्रशासन करीत आहे. या मुक्ति आंदोलनास या महासंघाचे वतीने जाहीर पाठींबा देण्यात येत आहे. या करिता महाबोधी टेंपल अॅक्ट १९४९ रद्द करावा तसा नवीन कायदा तयार करून बुध्दगया महाबोधी बिहार या पवित्र स्थळावर मनूवादी ब्राह्मणांचा असलेला कब्जा हटविण्यात यावा आणि हे प्राचीन पवित्र स्थळ बौध्दांचे ताब्यात देण्यात यावे, अशी बुध्दिस्ट सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी महासंघ रत्नागिरी (महाराष्ट्र राज्य) यांनी मागणी केली असून तसे निवेदन भारताचे मा. राष्ट्रपती, मा. पंतप्रधान, मा.मुख्यमंत्री (बिहार), मा.राज्यपाल (बिहार), मा. मुख्यमंत्री (महाराष्ट्र), मा. राज्यपाल (महाराष्ट्र) यांना मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेमार्फत दि. ०६/०३/२०२५ रोजी दिले आहे.

सदरचे निवेदन सादर करतेवेळी महासंघाचे अध्यक्ष श्री. बी. के. कुरतडकर, सरचिटणीस श्री. शरद कांबळे, कार्याध्यक्ष श्री. जे.पी. जाधव, उपाध्यक्ष श्री. सी.बी. मोहिते, श्री. एम.बी. कांबळे, श्री. मोहन जी. कांबळे, सहकोषाध्यक्ष श्री. सुरेश कांबळे, सहसचिव श्री. अनिल कांबळे, श्री. भिमदास सावंत, संघटक श्री. संतोष आयरे, सल्लागार श्री. गो.ल. साळवी, श्री. विजय गमरे, सदस्य श्री. सी.डी. गायकवाड, श्री. सिध्दार्थ कांबळे, श्री. भार्गव जाधव इत्यादी महासंघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 08-03-2025