रत्नागिरी, १७ एप्रिल २०२५ : रत्नागिरी येथील शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मध्ये सातत्याने घडणाऱ्या काही गंभीर प्रकारांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. येथे राष्ट्रगीत काही वेळा ऐच्छिक ठेवले जात असल्याचा आणि ठराविक समाजातील विद्यार्थ्यांना शुक्रवारी प्रार्थनेसाठी विशेष जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी केला आहे. या प्रकरणावर कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना जाब विचारत जोरदार निषेध नोंदवला.
काय आहे प्रकरण?
रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये राष्ट्रगीत नियमितपणे म्हणणे अपेक्षित असताना, ते अनेकदा दैनंदिन कामकाजातून वगळले जात असल्याचे कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणले. याशिवाय, ठराविक समाजातील विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी विशेष जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा गंभीर आरोप आहे. यावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थेट महाविद्यालय गाठून प्राचार्यांची भेट घेतली आणि काही व्हिडिओ पुरावे दाखवले.
गणवेश नियमांवरूनही वाद
कार्यकर्त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की, महाविद्यालयात गणवेश सक्तीचा नियम केवळ हिंदू विद्यार्थ्यांवर काटेकोरपणे लागू केला जातो, तर मुस्लिम विद्यार्थ्यांना कोणतेही बंधन नसल्याचे दिसून येते. अशा प्रकारची एकतर्फी वागणूक हिंदू विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
“राष्ट्रगीत हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. ते ऑप्शनला टाकणे आणि ठराविक समाजाला विशेष सवलत देणे हे अत्यंत निंदनीय आहे. हिंदू विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे,” – विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्याचे मत.
प्राचार्यांची दिलगिरी आणि आश्वासन
या सर्व मुद्द्यांवर कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना धारेवर धरल्यानंतर प्राचार्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी आश्वासन दिले की, “पुढे असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत. सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक दिली जाईल आणि कोणतेही अनुचित प्रकार त्वरित थांबवले जातील.”
परिसरात खळबळ आणि चौकशीची मागणी
या घटनेमुळे रत्नागिरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या प्रकरणाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
हा वाद शासकीय तंत्रनिकेतनच्या व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. राष्ट्रगीत आणि गणवेश नियमांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवरून निर्माण झालेल्या या वादामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये समानता आणि पारदर्शकता राखण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
