रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरीकडून हिंदी भाषा सक्तीच्या आदेशाची होळी करण्यात आली. केंद्र शासनाच्या शिक्षणात हिंदी भाषा अनिवार्य या आदेशाला राज ठाकरेंनी विरोध दर्शवला होता. त्याचे पडसाद सगळ्यात पहिले आज रत्नागिरीत उमटले. राज ठाकरेंच्या आदेशाच्या तंतोतंत पालनकरिता जिल्हाध्यक्ष सौंदळकरांच्या नेतृत्वाखाली आदेशाच्या प्रतीची होळी करून निषेध नोंदवण्यात आला.
हिंदी भाषा शिकवण्यासाठी सुमारे एक लाख शिक्षकांची गरज लागेल. तिथे ही हे परप्रांतीय आमच्या उरावर येऊन बसणार. आमच्या मराठी मुलांच्या शिक्षकांच्या नोकऱ्या खाणार. कशाला हवे आहे हे सगळे? प्रादेशिक भाषा व प्रादेशिक अस्मिता यांचा मानसन्मान राखला गेलाच पाहिजे. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला असताना शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकण्यासाठी सरकार जबरदस्ती का करत आहे? हे महाराष्ट्र आहे इथे मराठीच चालणार, असे देखील ठणकावून सांगण्यात आले. हिंदू आहोत; पण हिंदी नाही. जबरदस्ती कराल तर याहीपेक्षा जहाल आंदोलन बघायला मिळेल, असा इशारा या वेळी देण्यात आला.
जिल्हाध्यक्ष सौंदळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर, नवनियुक्त तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, उपतालुकाध्यक्ष रूपेश चव्हाण, शहराध्यक्ष बाबय भाटकर, शहर सचिव प्रभात सुर्वे, गौरव चव्हाण, महिला शहराध्यक्ष सुश्मिता सुर्वे, शहर सचिव संपदा राणा, शहर संघटक बिस्मिल्लाह नदाफ आदींनी आज या आदेशाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्याची होळी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 19/Apr/2025
