रत्नागिरी : जिल्ह्यात सात महिन्यांत मलेरियाबाधित ३१ रुग्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील ७ महिन्यांमध्ये मलेरियाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. जानेवारी ते जुलै २०२५ या कालावधीत जिल्ह्यात ३१ मलेरियाबाधित रुग्ण आढळले. जिल्हा हिवताप कार्यालयाने गावागावांत एक दिवस कोरडा पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंडणगड आणि रत्नागिरी तालुक्यांत एकही रुग्ण आढळलेला नाही.

हिवताप विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यात सर्वाधिक ९ रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये ७ पीव्ही (Plasmodium vivax) आणि २ मिक्स (PV+PF) प्रकारातील रुग्ण आहेत. चिपळूण तालुक्यात ७ रुग्ण आढळले आहेत. गुहागर आणि संगमेश्वर या दोन्ही तालुक्यांमध्ये प्रत्येकी ५ रुग्ण आढळले असून, ते सर्व पीव्ही प्रकारातील आहेत. राजापूर तालुक्यात २, खेड आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी १ पीव्ही प्रकारातील रुग्ण आढळला. मे, जून आणि जुलै या पावसाळ्याच्या कालावधीत सर्वाधिक मलेरियाचे रुग्ण आढळतात.

ऊन-पावसाच्या कालावधीत ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे डासांची पैदास वाढते. त्यानंतर मलेरियाचे रुग्णही वाढतात, असे निरीक्षण नोंदवले गेले आहे. मे महिन्यात एकूण ६, जून महिन्यात सर्वाधिक ९ आणि जुलै महिन्यात ४ रुग्ण आढळले. त्याशिवाय जानेवारी महिन्यात ३, मार्च महिन्यात २, एप्रिल महिन्यात ४ रुग्ण आढळले. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. रुग्ण आढळलेल्या भागात डासांची पैदास रोखण्यासाठी फवारणी मोहीम येत आहे. राबवण्यात येत आहे.

तातडीने उपचार घ्या
आरोग्य विभागाकडून मलेरियाची लक्षणे, प्रतिबंध आणि उपचारांविषयी जनजागृती करण्यासाठी आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. मलेरियाच्या लक्षणांची वेळीच ओळख पटवून तातडीने उपचार सुरू करण्याचे आदेश आरोग्यकेंद्रांना देण्यात आले आहेत.

नागरिकांनी स्वच्छता राखावी
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून डासांची पैदास वाढते. त्यामुळे, नागरिकांनी आपल्या घराच्या आसपास स्वच्छता राखावी, पाणी साठू नये याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 02/Aug/2025