राजापूर : राजापूर तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ५७१ मिमी कमी पाऊस झाला आहे. त्यात श्रावणसरींची राजापूरवासीयांना प्रतीक्षाच आहे. अधूनमधून एखादी सर पडत असल्याने कमी झालेल्या नोंदीचा फारसा परिणाम भातशेतीवर दिसलेला नाही; परंतु पुढील कालावधीत पावसाने दडी मारली तर एप्रिल-मे महिन्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते.
यावर्षी मे महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात मुसळधार पाऊस झाला; मात्र जून महिन्यात सुरुवातीला पावसाने दडी मारली. जुलै महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात सरींचा पाऊस कोसळला. श्रावणात दरवर्षी पावसाचा जोर कमीच असतो; परंतु तुलनेत मागील आठवड्यातील नोंदी पाहिल्या तर यावर्षी श्रावणात कमीच पाऊस पडला आहे. १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ५७१ मिमी पाऊस कमी झाला आहे. पावसाची वाटचाल भविष्यात अशीच अनियमित राहिल्यास उन्हाळ्यात त्याचा प्रभाव दिसेल.
राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. पावसाने दडी मारली असली तरीही त्याचा मोठा फटका भातशेतीला बसलेला नाही; पण कडकडीत ऊन पडत राहिले तर मात्र करप्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे बळीराजाचे मत आहे.
श्रावणसरीही रूसल्या
श्रावणाच्या सुरुवातीला तुलनेमध्ये पावसाचा जोर कमी असतो. त्याप्रमाणे श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पहिले चार दिवस सरासरी ३० ते ६७ मिमी एका दिवसामध्ये पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यानंतर, गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये सरासरी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 02/Aug/2025














