रत्नागिरी, (दि. २ ऑगस्ट) – श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वावर रत्नागिरीत प्रथमच सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, ४ ऑगस्ट रोजी ही यात्रा होणार असून, यात जिल्ह्यातील हजारो शिवभक्त सहभागी होतील, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे. यात्रेचे नियोजन करण्यासाठी नुकतीच एक बैठक पार पडली.
यात्रेचा उद्देश आणि तयारी
सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी आणि मरुधर विष्णू समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या कावड यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी घेतली आहे. पवित्र श्रावण महिन्यात गंगाजल घेऊन भगवान शंकराच्या चरणी अर्पण करण्याची अनोखी परंपरा असलेल्या कावड यात्रेमुळे रत्नागिरीतील शिवभक्तांना एक विशेष संधी मिळणार आहे. ‘बम बम भोले’, ‘शिवहरी’, ‘हर हर महादेव’च्या गजरात ही यात्रा शहरात काढण्यात येणार आहे.
कावड यात्रेचा मार्ग
४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता खेडशी, स्वामीनगर येथील श्री मरुधर विष्णू समाज भवन येथून या यात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर ही यात्रा खेडशी, कुवारबाव, साळवी स्टॉप, मारुती मंदिर, जेलनाका, कै. अरुअप्पा जोशी मार्गावरून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या दिशेने पुढे जाईल. यात्रेचा समारोप राजीवडा येथील ऐतिहासिक श्री काशिविश्वेश्वर मंदिरात होईल. तिथे कावडमधील पवित्र जलाने महादेवावर अभिषेक केला जाणार आहे.
यात्रेचे महत्त्व
सकल हिंदू समाज गेली अनेक वर्षे शहरात हिंदु नववर्ष स्वागतयात्रा आणि आषाढी एकादशीला आषाढीवारीचे आयोजन करत आहे. या माध्यमातून हिंदू समाजामध्ये एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता कावड यात्रेच्या निमित्ताने सर्व हिंदू बांधवांची एकी अधिक दृढ होणार आहे. ही यात्रा केवळ धार्मिक विधी नसून, सामाजिक एकतेचे प्रतीक बनेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन मन, शरीर आणि आत्म्याला शिवमय करावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. यात्रेच्या अधिक माहितीसाठी दीपक देवल (9422630621) आणि देवेंद्र झापडेकर (917020024242) यांच्याशी संपर्क साधता येईल. याशिवाय, श्री काशिविश्वेश्वर देवस्थानचे पदाधिकारीही या यात्रेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:55 02-08-2025














