कशेडी बोगद्यातील वीजपुरवठा वारंवार खंडित

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील करोडो रुपये खर्च करून उभारलेला कशेडी बोगदा पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. बोगद्यात वीजपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी तो सातत्याने खंडित होत असल्याने भुयारी मार्गात वाहन चालवणे कठीण बनले असून, अपघातांची शक्यता वाढली आहे.

एप्रिल-मे महिन्यांत दोन्ही बोगद्यात वीजपुरवठा कार्यान्वित झाल्याने वाहनचालकांमध्ये समाधान होते; मात्र, सध्या ही सुविधा अपूर्ण आणि अपयशी ठरत आहे. बोगद्यातील दिवे वारंवार बंद पडत असल्याने अंधारात वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे वाहनचालक गोंधळून जात असून, दुर्घटना टाळणे मोठे आव्हान बनले आहे. कशेडी बोगद्यात पाण्याची गळतीही मोठी समस्या आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ती तात्पुरती थांबवून दिलासा दिला होता; मात्र, गळती पुन्हा सुरू झाली आहे. यावर उपाययोजना करण्याऐवजी नव्या समस्या उद्‌भवत असून, आता खंडित वीजपुरवठ्यामुळे वाहनचालकांच्या समस्या अधिकच गंभीर बनल्या आहेत. याकडे संबंधित प्रशासनाने त्वरित लक्ष घालून तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि वाहनचालकांतून होत आहे.

बोगद्यांच्या उभारणीत ५३० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला; मात्र, आजही मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे. सतत उद्भवणाऱ्या अडचणींमुळे ‘हा खर्च खरंच जनतेच्या सुरक्षिततेसाठी झाला का?’ असा प्रश्न उपस्थित होतो. कशेडी बोगद्यात विजेअभावी अंधार आहे. ही स्थिती अपघातांना आमंत्रण देणारी आहे. मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागं होणार का ?- प्रसाद गांधी, सामाजिक कार्यकर्ते

बोगद्यात बसवलेले दिवे केवळ शोभेसाठी आहेत. केवळ बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दौऱ्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांनी बोगद्यातील दिवे कसे सुरू राहतील, याची दक्षता घेतली होती. त्यानंतर सर्वसामान्य वाहनचालकांकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केलेले दिसून येते- गिरीश गुरव, वाहनचालक, चिपळूण

महावितरणच्या वीजपुरवठा यंत्रणेत बिघाड होता, त्यामुळे कशेडी बोगद्यात विजेचा प्रश्न निर्माण झाला होता; मात्र त्यावर उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रकार थांबले आहेत. – पंकज गोसावी, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 13/Aug/2025