आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील प्रश्न सोडवा : प्रा. सुनील जोपळे

रत्नागिरी : आदिवासी समाजाच्या आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचे काम सुरू व्हावे, तसेच सध्याच्या वसतिगृहातील मुलांच्या समस्या दूर करण्याबाबत आमदार किरण तथा भैया सामंत यांच्याकडे मागणी करण्यात आली. ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील जोपळे यांनी ही मागणी नुकतीच त्यांची भेट घेऊन ही मागणी केली.

राजापूर-लांजा-साखरपा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांची पाली येथील निवासस्थानी प्रा. जोपळे यांनी भेट घेतली. संघटनेतर्फे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते अन्य कार्यक्रमांमुळे उपस्थित राहू शकले नव्हते. प्रा. जोपळे यांनी सामंत यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व वारली पेंटिंगची फ्रेम भेट देऊन सत्कार केला. याप्रसंगी उद्योजक आणि वडील अण्णा सामंत यांचादेखील सत्कार केला.

आदिवासी मुलांच्या वसतिगृहासाठी शासनाने आठ वर्षांपूर्वी शासकीय भूखंड उपलब्ध करून दिला; परंतु अजूनही तेथे बांधकाम होत नाही ते लवकरात लवकर व्यवे, आदिवासी शासकीय वसतिगृह ज्या भाड्याच्या इमारतीमध्ये म्हणजे बीएसएनएलच्या स्टाफ क्वार्टरमध्ये भाड्याने आहे. वसतिगृहात अनेक सुविधांची कमतरता आहे. आदिवासी विकास विभागाकडून वसतिगृहातील मुलांसाठी ज्या ज्या सुविधा मिळायला हव्यात त्या पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. बऱ्याच अडचणींचा सामना मुलांना करावा लागतो, याबाबत प्रा. जोपळे यांनी आमदार सामंत यांच्याशी चर्चा केली. ही कामे मार्गी लागावीत अशी विनंती केली. आमदार सामंत यांनी तत्काळ संबंधित विभागांना फोन करून ही कामे मार्गी लावण्यासाठी विचारणा केली व आदेश दिले.

आदिवासी भवनासाठी भूखंड, निधी
रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना स्वतःचं असं रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्यालय आदिवासी सांस्कृतिक भवन व्हावे यासाठी शासकीय भूखंड मिळावा. तसेच बांधकामासाठीदेखील निधी मिळावा, अशी मागणी प्रा. जोपळे यांनी आमदार सामंत यांच्याकडे केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 19/Aug/2025