SWASTH NARI SASHAKT PARIVAR ABHIYAAN : रत्नागिरी जिल्ह्यात “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानांतर्गत आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यामार्फत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानांतर्गत विशेष अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान राबविण्यात आले. यामध्ये महिलांच्या आरोग्य तपासणीसह उपचार आणि आवश्यक समुपदेशन सेवा देण्यात आल्या. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी शिक्षित करणे, जागरूक करणे आणि याबाबत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट होते.

या अभियानांतर्गत स्तन व गर्भाशय कर्करोगाची प्राथमिक तपासणी, रक्तदाब व मधुमेहाची तपासणी, रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी, असंसर्गजन्य आजार (एनसीडी) तपासणी, असुरक्षित महिलांसाठी क्षयरोग तपासणी, सामान्य आरोग्य समस्या यावर उपचार व समुपदेशन आदी तसेच किशोरवयीन मुली व महिलांसाठी रक्तक्षय तपासणी, गर्भवती महिलांसाठी प्रसूतपूर्व काळजी तपासणी, गर्भधारणादरम्यान पोषण व काळजी समुपदेशन, माता-बाल संरक्षण कार्डचे वितरण, बालकांना लसीकरण सेवा, मासिक पाळी स्वच्छता व पोषण विषयक जनजागृती, रक्तदान मोहिम, नेत्र तपासणी व उपचार, आयुष्मान भारत / वय वंदन कार्ड वाटप, निक्षय मित्र नोंदणी, अवयवदान मोहीम यांसारख्या विशेष सेवा प्रदान करण्यात आल्या. या अभियानात संपूर्ण जिल्ह्यात महिला व नागरिकांचा आरोग्य तपासणीसाठी व्यापक सहभाग दिसून आला.

जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा आरोग्य विभाग व काही खासगी आरोग्य संस्था यांच्या समन्वयातून एकूण ३८३९ आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. या सर्व शिबिरांमधून एकूण २ लाखांहून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

“स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानांतर्गत झालेल्या सर्व शिबिरांतून महिलांमध्ये आरोग्य तपासणीबाबत जागरूकता वाढविणे, आजारांचे लवकर निदान करणे आणि कुटुंबांचे आरोग्य बळकट करणे हा मुख्य हेतू साध्य झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुक्यांमध्ये तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत व ग्रामपंचायत, स्थानिक संस्था तसेच खासगी आरोग्य संस्था, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.

तपासणी शिबिरामधील आकडेवारी :
उच्च रक्तदाब तपासणी – २८,३०२ व्यक्ती
मधुमेह तपासणी -३०,९८५ व्यक्ती
कर्करोग तपासणी – १४,७७७ (मुख कर्करोग-७३६४), (स्तन कर्करोग-३६७९), (गर्भाशय मुख कर्करोग -३,७३४ व्यक्ती)
रक्तक्षय तपासणी : ४३,२७६ व्यक्ती (महिला-३२२०८, पुरुष – ११०६८).
गर्भवती महिलांची (ANC) तपासणी : ४२१४
आहार व समुपदेशन सल्ला सत्र -६४५
मासिक पाळी स्वच्छता / समुपदेशन केलेल्या किशोरवयीन मुली – १६१२९
लसीकरण लाभार्थी : ४,८४१ मुले (मुली-२५९९, मुले २२४२), लसीकरण कार्ड वाटप -८२३
क्षयरोग तपासणी : क्षयरोग तपासणी शिबिर -४५१, त्यामध्ये २५,९३१ व्यक्तीची तपासणी झाली.
(महिला-१८८६९ , पुरुष-७०६२). क्ष-किरण तपासणी-२९३४, NAAT टेस्ट-६७०, निक्षय मित्र नोंदणी:- ८८५, क्षयरुग्णांना फूड बास्केट वाटप – ८६.
आयुष्मान भारत / वय वंदन कार्ड वाटप : ३९,२४२ नागरिक
रक्तदाता नोंदणी (E-Raktkosh) : ७१५

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:07 PM 10/Oct/2025