रत्नागिरी : यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांत १० हजार ५७१ मुलं करणार शिक्षणाचा श्रीगणेशा!
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शाळा दिवसेंदिवस स्मार्ट होत निघाल्या आहेत. शैक्षणिक दर्जा बघता शाळेत पटसंख्या अजूनही टिकून आहे. यावर्षी तब्बल १० हजार ५७१ मुलं जिल्हा परिषद शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणाचा श्रीगणेशा करणार आहेत.
सध्या खासगी शाळांना पेव फुटला आहे. या खासगी शाळांची स्पर्धा करताना जिल्हा परिषदेच्या शाळांनीही भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्तेत कात टाकली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. यामध्ये तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, सराव चाचण्या यांचा समावेश आहे. त्याचबरोबर चार वर्षापूर्वी गुणवत्ता कक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामार्फतही विविध उपक्रम राबवले गेले. परिणामी, शिष्यवृत्ती परीक्षेत, नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत जिल्हा परिषदेचे विद्यार्थी चमकले आहेत.
जिल्हा परिषदेचा शैक्षणिक दर्जाही राज्यात सर्वोत्तम आहे. यामुळे पालकांचा ओढा पुन्हा जि. प. शाळांकडे दिसत आहे. नावीण्यपूर्ण योजनेतून शाळा डिजिटल बनवल्याने सुविधांमध्ये भर पडली आहे. त्यामुळेच आज जि.प.च्या शाळेत प्रवेशासाठी पालक इच्छुक आहेत, जिल्ह्यात १२ हजार मुलं पहिलीच्या वर्गात दाखल होणार आहेत. त्यापैकी १० हजार ५७१ विद्यार्थी जि.प. शाळेत प्रवेश घेऊ इच्छित आहेत. हे जिल्हा परिषदेचे यशच म्हणावे लागेल.
तालुका मुले मुली एकूण
मंडणगड २४१ २१२ ४५३
दापोली ६२८ ६४७ १२७५
खेड ५९३ ५४० ११३३
चिपळूण ८१३ ८०९ ८०५
गुहागर ४०३ ३९७ १६२२
संगमेश्वर ५५७ ५४९ ११०६
रत्नागिरी १०१६ १०२७ २०४३
लांजा ३८५ ३४३ ७२८
राजापूर ५१३ ४९६ १००९
नं.प. २०२ १९५ ३९७
एकूण ५३५६ ५२१५ १०५७१
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:39 PM 12/Jun/2024
What's Your Reaction?