रत्नागिरी : जि. प. स्वच्छतागृहाची टाकी फुटल्याने अस्वच्छता
रत्नागिरी : जिल्हा परिषद प्रशासन नेहमीच नागरिकांना स्वच्छतेबाबत सूचना करते. मात्र स्वच्छतागृहाची टाकी फुटल्याने भवनातच अस्वच्छता तसेच दुर्गंधी पसरली आहे. प्रवेशद्वारावर हे पाणी येत असल्याने नाक मुठीत धरून जिल्हा परिषदेत प्रवेश करावा लागत आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे आरोग्याची स्वच्छता कशी करावी, याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. सध्या तर सांडपाणी व कचऱ्याबाबत जनजागृती मोहीम सुरू आहे. ओला कचरा व सुका कचरा याबाबत ग्रामपंचायतीमध्ये उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन बैठका सुरू आहेत. त्याचबरोबर सध्या डेंग्यू तसेच इतर आजारांची साथ असल्याने आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. प्रशासन नागरिकांना स्वच्छतेचे धडे देत असले तरी जिल्हा परिषद भवनात मात्र अस्वच्छता दिसून येत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून स्वच्छतागृहाची टाकी फुटलेली असून, त्यातून पाणी प्रवेशद्वारावर येत आहे. तळमजल्यावर आरोग्य विभागाच्या बाजुला ही टाकी फुटली आहे. या अस्वच्छ पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्याचबरोबर परिसरात डासांचे प्रमाणही वाढले आहे. जि. प. भवनात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरूनच यावे लागत आहे. याचवाटेवरून अधिकारी येत-जात असले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:09 PM 17/Jul/2024
What's Your Reaction?