रत्नागिरी : जिल्ह्यातील २३१.४९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान
रत्नागिरी : जिल्ह्यात महिनाभरात पडलेल्या अतिवृष्टीने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. पडझडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. या अतिवृष्टीचा जिल्ह्यातील १४५ गावांतील १ हजार १९१ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. भात, नगदी आणि इतर पिके अशा एकूण २३१.४९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. तसा अहवाल जिल्हा कृषी विभागाकडून तयार केला आहे.
जिल्ह्यात १ ते २८ जुलैदरम्यान अतिवृष्टीने जनजीवन विस्कळित झाले होते. यावर्षी पावसाने खरिपातील शेतलावणी कामांना चांगली साथ दिली; परंतु त्यानंतरच्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील शेतीला फटका बसला आहे. जिल्ह्यातील मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठची शेती पाण्याखाली गेली. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने कृषी विभागाला दिले होते.
जिल्ह्यात खरीप पिकांखालील भातशेती सरासरी एकूण ६८०८८.३७ हेक्टर इतके क्षेत्र आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष पेरणी ३५८८८.०६ क्षेत्रावर झाली आहे. नगदी पिकाखालील सरासरी १०३९८.२१ हेक्टर क्षेत्र आहे. प्रत्यक्ष ३२९९.८८ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. या खरिपातील शेती लावण्याची कामे आतापर्यंत ७० टक्के पूर्णत्वास गेली आहेत. त्यावरून जिल्हा कृषी विभाग स्तरावरून जिल्हाभरातील नुकसानग्रस्त कृषी क्षेत्राचे पंचनामे करण्यात येत आहेत. त्यानुसार १ ते २८ जुलैदरम्यान एकूण १४५ गावांतील १ हजार १९१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये एकूण भातक्षेत्राचे २२८.३९ हेक्टर, नगदी पिकांचे ०.१३ हेक्टर तर इतर पिकांचे २.९७ हेक्टरवरील नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सांगितले
तालुकानिहाय नुकसान
मंडणगड : १० गावांतील एकूण ५४ शेतकऱ्यांचे ४.५४ हेक्टर
दापोली : ३१ गावांतील १५० शेतकऱ्यांचे १७.४३ हेक्टर
खेड : ५४ गावांतील ५३३ शेतकऱ्यांचे १७४.५५ हेक्टर
चिपळूण : ७ गावांतील २८ शेतकऱ्यांचे ०.६८ हेक्टर
गुहागर : १० गावांतील १८ शेतकऱ्यांचे १.२८ हेक्टर
संगमेश्वर : २३ गावांतील ३६० शेतकऱ्यांचे २९.०५ हेक्टर
राजापूर : १० गावांतील ४८ शेतकऱ्यांचे ३.९६ हेक्टरवरील नुकसान
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 30/Jul/2024
What's Your Reaction?