राजापूर : होळीत पाणीपुरवठा पंप महिलांनी काढला
राजापूर : होळी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर सडेवाडी योजनेसाठी बसविलेला पाणीपुरवठा पंप महिलांनी काढून टाकला अन् तो थेट राजापूर ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयात जमा केला. सडेवाडीसाठी राबवण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेसाठी स्वतंत्र विहीर व पंपहाऊस बांधून तेथून त्यांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होळीतील महिलांनी निवेदनाद्वारे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे.
ग्रुपग्रामपंचायत दळे कार्यक्षेत्रात असणाऱ्या होळी गावात पूर्वीपासूनच होळी ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. या योजनेतून या गावातील ८३ कुटुंबांना नियमित पाणीपुरवठा होतो. स्थानिक ग्रामस्थ ही योजना राबवत असून, यासाठी ग्रामपंचायत कोणतेही सहकार्य करत नाही.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत होळी सडेवाडी पाणीपुरठा दुरुस्ती योजना मंजूर केली आहे. यासाठी सुमारे २५ लाख ३६ हजार रुपयांचा निधीही मंजुर आहे. या योजनेतून सुमारे २१६ कुटुंबाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे ही योजना राबवताना यासाठी स्वतंत्र विहीर व पंपहाऊसची निर्मिती करून योजना राबवणे आवश्यक असताना जुनी योजना ज्या विहिरीवरून सुरू आहे त्या विहिरीत पंप लावून योजना राबवली जात आहे. एकाच विहिरीवर दोन पंप बसवण्यात आल्याने पूर्वीच्या योजनेवर परिणाम होऊन पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी असतानाही अशा १ प्रकारे जुन्या योजनेच्या विहिरीत पंप टाकून पाणीपुरवठा करण्याचा अट्टाहास कशासाठी, असा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे.
या विरोधात होळी येथील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत निवेदन दिले आहे. निवेदनावर सुनीता गुरव, प्रियांका गुरव, साक्षी शिरवडकर, सरिता गुरव, कविता गुरव, अलका गुरव, मंदा गुरव, रोशनी गुरव, रोहिणी कोर्लेकर, देवयानी कोर्लेकर, सविता गुरव, प्रमिला म्हादये इ आदींच्या सह्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 02/Aug/2024
What's Your Reaction?