दापोलीत महावितरणाची भूमिगत वीज जोडणी उघड्यावर
दापोली : नैसर्गिक आपत्तीत वीज वाहिनीसह विजेचे पोल तुटून पडतात. यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरचे महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होते. याला पर्याय म्हणून महावितरणकडून किनारपट्टी भागात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात येत आहेत. मात्र हे काम निकषाप्रमाणे होत नसल्याने पावसात या वीजवाहिन्या उघड्यावर पडल्या आहेत.
या भूमिगत वीज वाहिनीचे काम करताना साईडपट्टीची खोदाई केल्यामुळे तालुक्यात दाभोळ, कर्दे, आंजर्ले, लाडघर आदी ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, खोदलेल्या गटारांची माती रस्त्यावर येत असल्याने अपघात होत आहेत. मात्र, खोदलेली गटार आणि रस्ते हे सुरळीत कुणी करायचे याची जबाबदारी मात्र कोणताही विभाग घेत नाही. या सगळ्याचा त्रास मात्र नागरिकांना होत आहे.
याबाबत दापोली प्रांत अधिकारी यांच्याकडे एक लेखी तक्रारदेखील दाखल झाली आहे. मात्र, तरीही याकडे लक्ष देताना कोणीही दिसत नाही.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत महावितरण कंपनीचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. याची दखल दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांनी घेत महावितरण कंपनी अधिकाऱ्यांना समज दिली; मात्र तरीही येरे माझ्या मागल्या असेच चित्र आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत, भूमिगत वीज जोडणी करताना तीन फुटाचा खड्डा, त्यावर वाळू सिमेंटचा थर, पुन्हा वाळू असे कामाचे निकष आहेत. मात्र, या पद्धतीने काम झालेले नाही. यामुळे ही भूमिगत वीज वाहिनी उघड्यावर पडली आहे. याची तत्काळ दखल घेत दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
वितरण कंपनी करत असलेले दर्जाहीन काम स्पष्ट दिसत आहे. मात्र तरीही अधिकारी आणि शासन याकडे कानाडोळा करत आहे. या बाबत कारवाई करून कामाचा दर्जा सुधारेल याकडे लक्ष द्यावे - स्वरूप महाजन नागरिक, दापोली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 02/Aug/2024
What's Your Reaction?