मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मग टीईटीची अट कशासाठी?
रत्नागिरी : शासनाने सध्या विविध योजनांचा सपाटा लावला आहे. परंतु, यामध्ये अनेक अटी व शर्तीबाबत गोंधळाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेमध्ये ६ महिन्यांसाठी प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. यामध्ये बेरोजगार डीएड, बी.एड. पदवीधारकांना संधी देण्यात येणार आहे. परंतु, यामध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण असला तरच संधी देण्यात येणार आहे, मुळात प्रशिक्षणासाठीच या बेरोजगारांना संधी देण्यात येणार आहे. मग त्यासाठी टीईटीची अट कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढविण्यासाठी या कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना शैक्षणिक अहर्ताप्रमाणे १२ वी पास ६ हजार, आयटीआय/पदवीका ८ हजार व पदवीधर/पदच्युत्तर १० हजार शासनाकडून विद्यावेतन दिले जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने आहे.
या योजनेंतर्गत जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या पुढील पदांसाठी प्रशिक्षणार्थीची आवश्यकता आहे. यामध्ये विस्तार अधिकारी वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहाय्यक, वाहनचालक, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), ग्रामसेवक, विस्तार अधिकारी (कृषी), मिश्रक औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका (महिला), कनिष्ठ अभियंता (बांधकाम), प्राथमिक शिक्षक, परिचर, स्त्री परिचर, सफाई कामगार, चौकीदार आदी यांच्यासह ५०८ पदे भरण्यात येणार आहेत.
शिक्षकांची ३७० पदे आहेत. या पदासाठी १२ वी उत्तीर्ण, डीएड, किंवा बी. एड. व टीईटी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. मुळात हे शिक्षण सहा महिन्यांसाठी असून ते प्रशिक्षणासाठी असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. मुळात टीईटी परीक्षा ही ज्यांचे ६ महिने प्रशिक्षण झालेले आहे, अशांनाच या परीक्षेला बसायला दिले जाते. यामुळे टीईटी परीक्षेची अट कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुळात टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या ही फारच अल्प प्रमाणात आहे. टीईटी परीक्षेचा निकाल हा १० ते १५ टक्के इतकाच लागत आहे.
जिल्ह्याचा विचार केला तर ५० ते ६० इतकेच उमेदवार उत्तीर्ण आहेत. यामुळे ही अट शिथिल करावी, अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर चौकीदार व सफाई कामगार यांनाही १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे असल्याने ही अटही जाचकच असल्याचे दिसून येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 05/Aug/2024
What's Your Reaction?