गुहागर : जानवळे ग्रामपंचायतीची इमारत धोकादायक
गुहागर : तालुक्यातील ग्रामपंचायत जानवळे कार्यालय इमारत धोकादायक असल्याने नवीन इमारतीसाठी निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गुहागर तालुका मनसेतर्फे गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.
सध्या पावसाळ्यामध्ये या इमारतीच्या छप्परावर प्लास्टिक कागद टाकण्यात आला आहे. या इमारतीचे बांधकाम जवाहर रोजगार हमी योजनेतून इमारतीचे बांधकाम १९९५ ला झाले आहे. इमारतीचा पाया कमकुवत झाला असून, त्यामुळे ही इमारत धोकादायक बनली आहे. इमारतीचे क्षेत्रफळ कमी असल्यामुळे त्या ठिकाणी ग्रामसभा व इतर सभा ग्रामपंचायतीमध्ये होऊ शकत नाही. ३६८ चौरस फुटामध्ये दोन खोल्या असल्यामुळे मासिक सभेवेळीही ग्रामपंचायत सदस्यांना अडचण होते.
पावसाळ्यात छप्पर गळत असल्यामुळे कार्यालयीन रेकॉर्ड खराब होत आहे तसेच छप्पर कौलारू असल्यामुळे उंदरांचा फारच उपद्रव होत आहे. भिंतीना तडे गेले आहेत. त्यामुळे या धोकादायक इमारतीचे निर्लेखन करण्यात येऊन या ठिकाणी नवीन इमारत होण्यासाठी प्रयत्न व्हावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देताना मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे, जितेंद्र साळवी, सुशांत कोळवेकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 07/Aug/2024
What's Your Reaction?