राजापुर आगारातील उपहारगृह बंद; प्रवाशांसह कर्मचाऱ्यांची गैरसोय
राजापूर : राजापूर एसटी डेपोमध्ये असलेले एसटी कॅन्टीन मागील काही महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. आता गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने या काळात राजापूर आगारात प्रवाशांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हे एसटी कॅन्टीन लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजीम जैतापकर यांनी केली आहे.
राजापूर एसटी डेपोमध्ये गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या एसटी कॅन्टीनमुळे राजापूर तालुक्यातून येणारे प्रवासी तसेच अन्य तालुका वा जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची चहा, नाश्ता तसेच जेवणाची सोय होत होती.
मात्र, मागील काही महिन्यांपासून हे एसटी कॅन्टीन बंद करण्यात आले आहे. एसटी प्रशासनाने भाडेवाढ केल्याने संबंधित कॅन्टीन चालकाने कॅन्टीन बंद केल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, एसटी कॅन्टीन बंद झाल्याने राजापूर आगारात येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
लवकरच गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून या कालावधीत राजापूर एसटी आगार प्रवाशांनी गजबजलेले असते. गणेशोत्सवाकरीता मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी येत असतात. अशावेळी एसटी कॅन्टीन नसल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी एसटी कॅन्टीन सुरू करावे, अशी मागणी अजीम जैतापकर यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 12/Aug/2024
What's Your Reaction?