राजापुरात नोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडा
राजापूर : आपण सरकारी अधिकारी असून वरिष्ठांपर्यंत चांगली ओळख आहे. मी आपणाला तुरुंग किंवा न्यायालयात नोकरी मिळवून देतो, अशी बतावणी करत एका भामट्याने काही तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे. राजापूर रेल्वेस्थानक परिसरामध्ये हा फसवणुकीचा प्रकार घडला असून, आपले बिंग फुटण्याची कुणकुण लागताच त्या भामट्याने तेथून पोबारा केल्याचे बोलले जाते.
दरम्यान, पोलिस ठाण्याचा ससेमिला आपल्या पाठीमागे नको म्हणून फसवणूक झालेला एकही तरुण तक्रार देण्यासाठी पुढे आलेला नाही. राजापूर रेल्वे स्थानकात अधिकारी म्हणून कामाला असल्याचे भामट्याने या परिसरात भाड्याने खोली घेतली होती. जवळच एका कुटुंबाकडे महिना सुमारे ५ हजार रुपये देण्याच्या बोलीवर खानावळही लावली होती. तिथे राहत त्याने तेथील एका तरुणावर जाळे टाकण्यास सुरुवात केली. आपण एका शासकीय कार्यालयात अधिकारी आहे. काही तरुणांनी त्याच्यासोबत वैभववाडी, कुडाळ, ओरस, वेंगुर्ला, अशा वाऱ्या केल्याचे बोलले जात आहे. यामध्ये संबंधित तरुणाला लांबूनच जंगलाकडे बोट दाखवून येथे तुरूंग असून येथे तुला कैद्यांची राखण करावी लागणार असल्याचे सांगितले. काहींना न्यायालयात नोकरी मिळवून देतो, असे सांगितले.
आपली पत्नी राजापूर न्यायालयात नोकरीला असून मुलगे सुना चांगल्या हुद्द्यावर आहेत, असेही तो सांगत असे. आपल्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांनी मोबाईल वापरास विरोध करीत होता. तो कधी आपण पावस, तर कधी नाखरे गावातील असल्याचेही सांगत होता. या रेल्वेस्थानक परिसरातील एका तरुणाने ही सर्व माहिती एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता असलेल्या प्रतिष्ठीत व्यक्तीला सांगितली. त्यांनी संबंधित भामट्याची माहिती गोळा केली. या दरम्यान, आपले बिंग फुटण्याचा अंदाज त्या भामट्याच्या येताच त्याने संबंधित खानावळीतील व्यक्तीला आपली चार माणसे येत असून त्यांचे जेवण करा, म्हणून सांगत रेल्वेने पोबारा केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 13/Aug/2024
What's Your Reaction?