रत्नागिरी : पावस येथे विद्यार्थ्यांनी केले स्वातंत्र्यदिनी रास्ता रोको आंदोलन
पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनीच एसटी फेऱ्यांच्या सावळ्या गोंधळामुळे रास्ता रोको आंदोलन केले.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सातच्यादरम्यान विद्यार्थी परिसरातील खेडेगावातून ध्वजवंदनासाठी शाळेत आले. त्यानंतर त्यांना घरी जण्यासाठी सकाळी ९ ते दुपारी दीड वाजेपर्यंत एसटीची एकही गाडी उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे आपल्या हक्कांसंबंधी जागृत असलेल्या विद्यार्थ्यांनी पावस बसस्थानक येथे स्वयंघोषित रास्तारोको केला; मात्र विद्यार्थ्यांनी इतर वाहनांच्या वाहतुकीत कोणतीही आडकाठी केली नाही. आलेल्या एसटी बसेस त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यदिनीच आपल्या हक्कांप्रती विद्यार्थ्यांनी केलेल्या या आंदोलनाचे उपस्थितांनी कौतुक केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर असे प्रसंग शालेय ओढवत असतील तर सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याप्रमाणे सवलतीही सक्तीने अंमलात आणा, असे तर विद्यार्थ्यांना सूचित करायचे होते का? असा सवाल येथे उपस्थित नागरिकांना पडला. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार दुपारी १ वाजून २० मिनिटांनी पावस-नाखरे बस आल्याने विद्यार्थ्यांनी रास्ता रोको थांबवला.
नाखरेसारख्या खेडेगावांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थीसंख्या असून ते शिक्षणासाठी पावस येथे येतात; परंतु अनेकवेळा एसटीच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना वारंवार त्रास सहन करावा लागतो. याकडे संबंधित खात्याचे अधिकारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे प्रत्येकवेळी हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. विजय चव्हाण, उपसरपंच, नाखरे ग्रामपंचायत
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 17/Aug/2024
What's Your Reaction?