ग्रामीण भागासाठी सूर्यघर मोफत वीज योजना फायदेशीर : अभियंता धनाजी कळेकर
पाली : केंद्र शासनाने पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. त्यात ऐक ते तीन किलोवॉट क्षमतेच्या घराच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला ३० ते ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेतील ग्राहकाच्या प्रकल्पातून गरजेहून जास्त वीज तयार झाल्यास ती त्यांना महावितरणला विकता येणार असून त्यांना मोफत वीज मिळणार आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांनी या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला पाहिजे, असे महावितरणच्या पाली विद्युत शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता धनाजी कळेकर यांनी केले आहे.
महावितरणच्या पाली शाखा कार्यालयाच्याकडून स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेच्या माध्यमातून पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेची प्रसिद्धी व प्रचार पाली, खानू ग्रामपंचायतीचे मध्ये व महिला बचतगटांच्या प्रभाग संघ बैठकीत व वीज ग्राहकांसाठी माहिती पत्रकांचे वाटप करून करण्यात आली. यावेळी महावितरण पाली शाखा कार्यालयाच्या प्रधान तंत्रज्ञ सौ.दुडये, तंत्रज्ञ प्रशांत तेरेकर, शिकाऊ उमेदवार करण सावंत, पाली सरपंच विठ्ठल सावंत, अॅड.सागर पाखरे, अभिषेक साळवी,बचत गटाच्या महिला सदस्य उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना सहाय्यक अभियंता श्री. कळेकर यांनी सांगितले की, भविष्यातला विचार करता सौरऊर्जा ही आपल्याला फायदेशीर अशीच आहे कारण ती पुरेश्या प्रमाणात मोफत उपलब्ध आहे तिचा वापर आपण घरगुती वापरासाठी केल्यास आपल्याला प्रदूषणविरहित ऊर्जा मिळेल. त्याच बरोबर विजेच्या ऊपलब्धतेच्या बाबतीत आपण स्वावलंबी होऊ शकतो. त्यामुळे मोफत सूर्यघर या फायदेशीर योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घेतला पाहिजे. त्याकरिता अधिक माहितीसाठी पाली महावितरणच्या शाखा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 19-08-2024
What's Your Reaction?