'राखी'ने केले बाजारपेठांचे रक्षण
◼️ देशात १२ हजार कोटींची उलाढाल शक्य; 'सीएआयटी'ची माहिती
पुणे : राखी पौर्णिमेच्या निमित्ताने होणाऱ्या खरेदीच्या माध्यमातून यंदा देशभरात १२ हजार कोटीहून अधिकची उलाढाल होऊ शकते. राखी खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होत असून लोकांमध्ये सणाबद्दल प्रचंड उत्साह आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात फक्त स्वदेशी राख्या विकल्या जात आहेत. या वर्षीही बाजारात चायनीज राख्यांना मागणी नव्हती, अशी माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सकडून (सीएआयटी) देण्यात आली.
पुण्याच्या सीट राखीला देशभरातून मागणी वाढली आहे. सर्व सण उत्सव भारतीय वस्तूंसह साजरे करावेत, तसेष स्थानिक उत्पादकांनाच महत्व द्यावे, असे आवाहन देखील 'सीएआयटी' कडून व्यापारी आणि ग्राहकांना करण्यात आले आहे. याबाबत सीएआयटी' चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल सांगितले की, राख्यांची वाढलेली मागणी पाहता यंदा १२ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होईल, अशी अपेक्षा आहे. गतवर्षी १० हजार कोटी, २०२२ मध्ये सात हजार, २०२१ मध्ये सहा हजार, २०२० मध्ये पाच हजार, २०१९ मध्ये तीन हजार ५०० आणि २०१८ मध्ये तीन हजार कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता.
'सीएआयटी'चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी सांगितले, की यावर्षी देशभरातील विविध शहरांतील प्रसिद्ध उत्पादनांमधून खास प्रकारच्या राख्या बनविण्यात आल्या आहेत. यामध्ये नागपुरातील खादी राखी, जयपूरची सांगणेरी आर्ट राखी, पुण्याची सीड राखी, मध्य प्रदेशातील सतना येथील लोकरीची राखी, आदिवासी वस्तूंपासून बनवलेली बांबूची राखी, आसामची चहाच्या पानांची राखी, कोलकता येथील ज्यूट राखी, मुंबईची सिल्क राखीचा समावेश आहे.
"सर्व राज्यांतील व्यापारी भारतीय वस्तू विकण्यावर जोर देत आहे. तसेच ग्राहकही आता भारतीय उत्पादनांना मागणी करू लागले आहेत. गेल्या चार वर्षांपासून 'सीएआयटी' देशात व राज्यात विशेषतः सणांच्या काळात भारतीय उत्पादनांच्या खरेदीला आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी व स्थानिक उत्पादकांनाच महत्त्व देण्याची मोहीम यशस्वीपणे राबवत आहे." - सचिन निवंगुणे, राज्य अध्यक्ष सीएआयटी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 19-08-2024
What's Your Reaction?