दिवाळीत भाजपा विजयाचे फटाके वाजवणार : बाळ माने
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाने बाजी मारली. खासदार नारायण राणे यांचा विजय हा आपल्यासाठी शुभशकुन आहे. तसेच ज्या दिवसापासून राजेश सावंत जिल्हाध्यक्ष झाले तेव्हापासून विजयाची मालिका सुरू झाली आहे.
रत्नागिरीत भाजपाचाच आमदार विजयी होऊन येत्या दिवाळीत विजयाचे फटाके वाजवणार, असा विश्वास माजी आमदार तथा भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब माने यांनी व्यक्त केला.
टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये रत्नागिरी तालुक्याच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. बाळ माने म्हणाले की, १९८९ पासून मी निवडणूक प्रक्रिया पाहत आहे. तात्यासाहेब नातू तेव्हा उभे राहिले होते. त्यानंतर ४० वर्षांनी नारायण राणेंच्या रूपाने भाजपचा खासदार निवडून आला. लोकसभेला रत्नागिरीत ६५ हजार मते राणे यांना मिळाली आहेत. अजून १० हजार मते भाजपाची होती, परंतु ते मतदानाला आले नाहीत. आता विधानसभेत ही मते १ लाखांवर न्यायची आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचा उमेदवार असेल, असे चित्र नव्हते. शिमगा आला, रोकेगा कौन, ठोकेगा कौन झाले. पण १८ एप्रिलला उमेदवारी जाहीर होऊन ४ जून रोजी राणे विजयी झाले. असा विजय विधानसभेतही मिळवायचा आहे.
प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष दादा दळी यांनी आढावा घेतला. बूथ कमिट्या पूर्ण असल्याचे सांगितले. महायुतीत असतानाही गेल्या अडीच वर्षांत आमच्या गावांत विकासकामे का झाली नाहीत, असा जाब मला कार्यकर्ते विचारत आहेत. त्यामुळे रत्नागिरीची विधानसभेची जागा भाजपालाच मिळावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी त्यांनी जिल्हाध्यक्षांकडे केली.
जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले की, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, नगराध्यक्ष, सरपंच अशा पदांवर भाजपा कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे. आपल्या गावात विकासकाम झाले नाही, मग आपलाच माणूस निवडून आला पाहिजे, असे वाटले पाहिजे. जिल्ह्यात परिवर्तनाची लाट आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत १४५ पेक्षा जास्त आमदार निवडून येण्यासाठी भाजपाचे प्रयत्न चालू आहेत.
मेळाव्याला महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, ओबीसी जिल्हाध्यक्ष भाई जठार, युवा जिल्हाध्यक्ष ऋषीकेश केळकर, डॉ. चंद्रशेखर निमकर, संजय निवळकर, लीलाधर भडकमकर, ओंकार फडके, राजेश पाथरे, अवधूत कळंबटे, बावा नाचणकर, मनोज पाटणकर, अशोक वाडेकर, संतोष बोरकर, सुशांत पाटकर, संकेत कदम, ऐश्वर्या जठार, प्रकाश पवार, भाई जठार, संघमित्रा कुरतडकर, यांच्यासमवेत २५० हून जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 21-08-2024
What's Your Reaction?