"बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना निर्माण करा" : राज ठाकरे

Aug 21, 2024 - 14:58
Aug 21, 2024 - 16:31
 0
"बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना निर्माण करा" : राज ठाकरे

मुंबई : बदलापूर शाळेतील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणावरुन सध्या जनभावना उसळल्या असून लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. सर्वसामान्य नागरिकांकडूनही या घटनेचा निषेध केला जात असून राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळत आहे.

बदलापूरमध्ये काल या घटनेच्या निषेधार्ह आंदोलन करण्यात आलं होतं, त्या आंदोलनावेळी आरोपीला आजच फाशी द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच, लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण योजना आणा, असे फलकही आंदोलकांकडून झळकले. त्यामुळे, या घटनेचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडू होत आहे. तर, विरोधकही या घटनेवरुन आक्रमक झाले आहेत, मविआकडून 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विट करुन राज्य सरकारला चांगलंच फैलावर घेतलं आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली असून आज ते गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत. दरम्यान, बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरुन संतप्त शब्दात राज ठाकरे यांनी भावना व्यक्त करत सरकारला धारेवर धरलं आहे. बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार 'लाडकी बहीण' योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

स्वत:च ब्रँडिंग करण्यापेक्षा तिच्या सुरक्षेची भावना निर्माण करा

जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय, याचा मला अभिमान आहे. पण, मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, असेही राज यांनी ट्विटरवरुन लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:27 21-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow