चिपळूण : लाडक्या बहिणीच्या नावाखाली उधळपट्टी : काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शहा
चिपळूण : लाडक्या बहिणीच्या नावाखाली शासन उधळपट्टी करत आहे. रत्नागिरी येथे मुख्यमंत्री येणार म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एसटी गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय झाली.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी शासकीय तिजोरी आणखी खाली करत आहेत; मात्र यामुळे जनतेचे मत बदलणार नाही, जनता आपली ताकद दाखवणारच, असे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
रत्नागिरी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महिला बालविकासमंत्री आदिती तटकरे आले होते. येथे जिल्ह्यातून आलेल्या लाडक्या बहिणींसाठी मोठा शामियाना घालण्यात आला होता. महिलांना आणण्यासाठी जिल्हाभरातून ११०० बसची व्यवस्था केली होती. अनेक महिलांना प्रशासनाने वेठीस धरून कार्यक्रमाला नेले. तेथे अनेक महिलांना बसण्यासाठी जागादेखील मिळाली नाही. बचतगटातील महिलांना अनेक ठिकाणी या कार्यक्रमास जाण्यासाठी सक्ती करण्यात आली.
विकासाच्या नावाखाली शासकीय कार्यक्रम राबवून राजकीय फायदा उठवण्याचा हा प्रकार आहे. यापूर्वी शासन आपल्या दारी, या कार्यक्रमासाठी देखील अशाच पद्धतीने मोठा खर्च केला गेला. शासनाच्या पैशातून केलेल्या या कार्यक्रमातून सत्ताधारी पक्षाला काहीही साधता आलेले नाही, असे शहा यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 22/Aug/2024
What's Your Reaction?