मान्सून आजपासून पुन्हा सक्रिय..
रत्नागिरी : ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभीच विश्रांती घेतलेल्या पावसाने दुसर्या पंधरवड्यातही पाठ फिरवली आहे. यामुळे तापमानात कमालीची वाढ झाली असून, दुपारी रणरणते ऊन पडत आहे. मात्र, शुक्रवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस बरसला. त्यानंतर मात्र पुढील तीन दिवस जिल्ह्यात पावसाने दडी मारली. आठवडा भर पावसाचा खंड सुरू असून, पावसाने पाठ फिरविल्याने तापमानात झालेली वाढ वैशाखी ठरत आहे. मात्र, येत्या 24 तासांत कोकण किनारपट्टी भागातील रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा; तर मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत विजांसह जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. किरकोळ सरींचा अपवाद वगळता गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात केवळ 2.34 मि.मी.च्या सरसरीने 21.10 मिमी एकूण पाऊस झाला.
यंदा पाऊस लवकर सुरू होण्याबरोबरच वार्षिक सरासरीपेक्षाही पाऊस अधिक पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. 1 जूनपासून नियमित सुरू झाला. त्याचप्रमाणे सुरुवातही जोरदार केली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात श्रावणातच वैशाख वणवा कडाक्याच्या उन्हाला सुरुवात झाली आहे. गेले दोन दिवस वातावरण कोरडे पडत आहे. तापमान दुपारी 12 वाजता 30 ते 31 अंशांवर झेपावल्याने वातावरणात प्रचंड उकाडा होता.जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत 2813 मि.मी. सरासरी वाटचाल पूर्ण केली असून, 83 टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी या कालावधीत 2382 मि.मी.च्या सरासरीने 70 टक्के पाऊस झाला. गतवर्षाच्या तुलनेत पाऊस 10 टक्क्याने जास्त आहे. जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार मि.मी. सरासरी पाऊस होतो. या तुलनेत 600 मि.मी. पाऊस अद्याप होणे अपेक्षित आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यातील पावसाने पुरती दडी मारल्याने पावसाची सरासरी वाटचाल अडचणीची झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 23-08-2024
What's Your Reaction?