Ratnagiri : जेएनपीटीला पर्यायी बंदर म्हणून जयगडच्या जेएसडब्ल्यू बंदराचा विचार
रत्नागिरी : जेएनपीटी बंदरात मालवाहतुकीसाठी प्रचंड गर्दी होत असल्यामुळे त्याला पर्यायी बंदरांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी जयगड (ता. रत्नागिरी) येथील जेएसडब्ल्यू बंदराचा विचार सुरू आहे. या ठिकाणाहून कोकणातील आंबा, काजूसह प्रक्रिया पदार्थांची निर्यात करता येणार आहे. तसेच जेएनपीटी बंदरावरचा निर्यातीचा भार हलका होईल आणि कोकण अॅग्रीकल्चर एक्स्पोर्ट हब बनेल, असा विश्वास अपेडाचे संचालक परशराम पाटील यांनी व्यक्त केला.
अपेडा आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोकणातील बंदरांचा निर्यातीसाठी सव्हें केला जात आहे. त्यासाठी अपेडाचे संचालक परशराम पाटील आणि अन्य अधिकारी गेले दोन दिवस रत्नागिरीसह जिल्ह्यातील बंदरांची पाहणी करीत आहेत. जयगड येथील जेएसडब्ल्यू बंदराचीही त्यांनी पाहणी केली, तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्यातीसाठीच्या सुविधांबाबत माहिती घेतली. आंबा व काजू बागायतदारांशी चर्चा करून निर्यातीला माल उपलब्ध होतो का याचीही चाचपणी केली. जेएसडब्ल्यू बंदरातून कृषीमाल निर्यात शक्य झाल्यास कोकण कृषीमाल निर्यातीचे हब होईल, असे अपेडाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.
याबाबत अपेडाचे संचालक पाटील म्हणाले, मंगळूर ते जेएनपीटी या टप्प्यात मालवाहतूक सुरू होईल, असे जयगड येथील जेएसडब्ल्यूचे एकमेव बंदर आहे. या ठिकाणाहून निर्यात करण्यासाठी सुविधाही आहेत. कोकणातील आंबा, काजूसह प्रक्रिया पदार्थाची निर्यात करणे या बंदरातून शक्य आहे. कोकणातील कृषी माल जेएनपीटी बंदरातून परदेशात पाठविला जातो. हा कृषी माल रत्नागिरीमधून जेएनपीटी बंदरात नेण्यासाठी प्रत्येक कंटेनर मागे सुमारे सात हजार रुपये खर्च येतो. कृषी मालाची जेएसडब्ल्यूमधून वाहतूक झाली तर सुमारे दहा टक्के खर्च कमी होईल. त्याचा फायदा निर्यातदार किंवा शेतकऱ्याला थेट होऊ शकतो. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारची अपेडा आणि राज्य शासनाची मित्र (महाराष्ट्र इन्स्टीट्यूशन फॉर ट्रान्स्फॉरमेशन) संस्था यांच्यावतीने जेएसडब्ल्यूच्या बंदराची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सुमारे एक हजार कंटेनर एक्सपोर्ट झाले तर जेएनपीटीवरील भार कमी होणार आहे. तसेच जयगड येथून कोकणासह कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा येथील कृषीमाल किंवा अन्य मालाची निर्यात करता येईल. ही निर्यात सुरू झाली की नवे रोजगार निर्माण होऊ शकतात. तसेच निर्यातदारांची साखळी तयार करणे शक्य आहे.
पुढील हंगामापूर्वी निर्णय
आंबा, काजूचा यंदाचा हंगाम संपला असला तरीही पुढील हंगामापूर्वी जयगड येथील बंदरातून निर्यात सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे संचालक पाटील यांनी सांगितले. अपेडा ही संस्था कृषी शेतमाल निर्यातीसाठी प्रयत्न करते. आतापर्यंत विविध देशांमध्ये कृषी माल पाठविण्यात येत आहे. जेएनपीटी बंदरातून निर्यातीसाठी चार ते पाच दिवस प्रतीक्षा करावी लागते. कृषी माल नाशवंत असल्यामुळे तो वेळेत जाणे गरजेचे आहे. त्यासाठी जयगड बंदराचा पर्याय सुलभ आहे, असे पाटील यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 25-05-2024
What's Your Reaction?