चिपळूण : सावर्डे येथील कात उद्योगाविरोधात उपोषण सुरूच
चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथील कात उद्योगाच्या दूषित सांडपाण्यावरून सावर्डे ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी सुरू केलेले उपोषण अद्यापही सुरूच राहिले आहे. कात उद्योग बंद करावा, या मागणीवर उपोषणकर्ते ठाम राहिल्याने तोडगा निघालेला नाही. आमदार, प्रांताधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चाही निष्फळ ठरल्या आहेत.
सावर्डे येथील कात उद्योगातून कापशी नदीला दूषित पाणी सोडले जाते. परिणामी, परिसरातील विहिरीचे पाणी दूषित झाले असून शेतीचे नुकसान होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. त्यामुळे कात उद्योगावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सावर्डे परिसरातील ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनापासून साखळी उपोषण प्रांत कार्यालयासमोर सुरू ठेवले आहे. उपोषणावर तोडगा काढण्यासाठी आमदार शेखर निकम, प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी बैठका घेतल्या. उद्योगाचा वीजपुरवठा खंडित केला; मात्र जनरेटरच्या आधारे उद्योग सुरूच आहे.
आमदार शेखर निकम यांनी यापूर्वी कारखान्यातील दूषित पाण्याच्या मुद्दयावरून संबंधित उद्योगाचे मालक व ग्रामस्थांची बैठक घेतली होती. त्यावेळी सांडपाण्यावर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे ठरले होते. त्याचे कामही सुरू झाले; मात्र जलशुद्धीकरणाचा संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. त्यामुळे उपोषणकत्यांनी इतर मागण्यांच्या चर्चेला नकार देत थेट उद्योग बंद करण्याची भूमिका घेतली आहे. पहिल्या टप्प्यात सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत पाठिंबा दिला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी सामूहिकपणे साखळी उपोषण सुरू ठेवले आहे. ग्रामस्थ उद्योग बंद करण्याच्या मागणीवर ठाम आहेत; मात्र येथील अधिकारी थेट उद्योगाला टाळे ठोकत नसल्याने उपोषण सुरूच राहण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 28/Aug/2024
What's Your Reaction?