"राजकोट किल्ल्यावर सत्ताधाऱ्यांची झुंडशाही'' : विजय वडेट्टीवार
सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागण्यासाठी सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा उभारला. महायुतीच्या टक्केवारीच्या धोरणामुळे या पुतळ्यात सरकारने पैसे खाल्ले.
त्यामुळे पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. परिणामी केवळ आठ महिन्यात हा पुतळा कोसळला. सर्वांची मान शरमेनं खाली गेली. महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. महाराष्ट्रातील जनता भ्रष्ट महायुतीला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार आसूड ओढले.
सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेस्तनाबूत झाला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या मोर्चाला संबोधित करताना विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, महायुतीने गुजरातकडे महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे. पंडित नेहरूंच्या हस्ते अनावरण झालेले पुतळे आजही भक्कम स्थितीत आहेत. महायुतीच्या चोर, लुटारू, डाकू यांनी महाराष्ट्र लुटला आहे. पुतळा उभारणारा जयदीप आपटे २४ वर्षाचा आहे, त्याला अनुभव नसताना मूर्ती करायला दिली. आता तो फरार आहे. वाऱ्याने या परिसरात एक नारळ पडत नाही, ताडपत्री उडाली नाही. पुतळा कसा पडला हा प्रश्न आहे! आणि मुख्यमंत्री वाऱ्याच्या वेगाचे कारण देत आहेत.
महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे जलपूजन पंतप्रधान मोदींच्या केले. एक वीटही अजून रचली नाही. फक्त लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून मतांसाठी कार्यक्रम केला.त्यामुळे जनता महायुतीला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही किल्ल्यावर पाहणी करायला गेलो. त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी गुंडगिरी केली.ही सरकारची झुंडशाही आहे. ही झुंडशाही आता जनता खपवून घेणार नाही असा इशारा देखील विजय वडेट्टीवार यांनी दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:31 28-08-2024
What's Your Reaction?