बांधकाम कामगारांकडून पैसे मागणाऱ्यांवर कडक कारवाई करा : पालकमंत्री उदय सामंत
चिपळूण : नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना शासनाकडून गृहोपयोगी वस्तु, अत्यावश्यक संच आणि सुरक्षासंच मोफत दिला जात आहे. हे वस्तू संचासाठी कोणीही पैसे मागत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करा, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधिताना दिल्या.
कामगार विभाग आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई (जिल्हा रत्नागिरी) यांच्यावतीने चिपळूण तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना गुरूवारी पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षासंच व गृहोपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चिपळूण येथे झाला. पालकमंत्री सामंत म्हणाले, नोंद झालेल्या बांधकाम कामगारांना १९ हजार किंमतीचे वस्तूसंच मोफत दिले जात आहेत; परंतु, काही ठिकाणी यासाठी पैसे मागण्यात येत असून भ्रष्टाचार केला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारे पैसे मागणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करा.
कामगार विभागामार्फत बांधकाम कामगारांसाठी मुलांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजना सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. या योजनांपासून कोणीही वंचित राहणार नाही, यासाठी दक्षता घ्यावी.
राकेश दाते, मिनाक्षी कांबळे, सोनम सावंत, राजश्री जाधव, अस्मिता कदम यांना यावेळी गृहोपयोगी वस्तू व सुरक्षासंचचे प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. बांधकाम कामगार अरविंद पिंपळकर यांना मुलींच्या विवाहासाठी ५१ हजारांचा धनादेश, नोंदीत बांधकाम कामगार प्रमोद काजरे यांना त्यांच्या विवाहासाठी ३० हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी आमदार शेखर निकम, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, सहायक आयुक्त कामगार संदेश आयरे, मुख्याधिकारी विशाल भोसले, तहसीलदार प्रवीण लोकरे, परीविक्षाधीन सहायक कामगार आयुक्त निशिगंधा रसाळ, आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 31/Aug/2024
What's Your Reaction?