रत्नागिरी : पावस मार्गावर मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी
पावस : मोकाट जनावरांच्या वावरामुळे रत्नागिरी ते पावस हा सागरी मार्ग वाहन चालकांना धोकादायक ठरत असून, परिसर दिवसेंदिवस अपघात क्षेत्र बनत आहे. मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या परिसरातील फणसोप, कसोप, कुर्ती, मागलाड, कोळंबे, गोळप या गावातील अनेक शेतकऱ्यांकडे पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वी या जनावरांच्या पाठीवर गुराखी असायचे; परंतु सध्या ही पद्धत बंद झाल्यामुळे जनावरांना माळरानावर सोडले जाते. गावठाण भागामध्ये आंबा कलमांच्या जागा असल्यामुळे त्या बंदिस्त असतात. त्यामुळे रत्नागिरी ते पावस या कातळ सड्यावर जनावरे सोडली जातात, दिवसभर रानात चरून रात्रीच्या वेळी ही जनावरे रस्त्यावर ठाण मांडतात. याचा त्रास या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकी वाहनांना मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या मार्गावर अनेक छोटे मोठे अपघात घडतात, काही महिन्यांपूर्वी नाखरे गावात मोकाट जनावरांपासून होणाऱ्या त्रास वाचवण्यासाठी ग्रामसभेमध्ये ठराव करण्यात आला. ज्या मालकांची जनावरे आंबा बागायतदार व अन्य शेतीचे नुकसान करतील त्या मालकांवर कारवाई करण्याचे आदेश ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठरावाद्वारे करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे या मार्गावरील प्रत्येक ग्रामपंचायत याबाबत ठोस निर्णय घेऊन जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:09 PM 02/Sep/2024
What's Your Reaction?