राजापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून अजित विश्वासराव इच्छुक

Sep 3, 2024 - 09:40
Sep 3, 2024 - 09:52
 0
राजापूर  विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून अजित विश्वासराव इच्छुक

रत्नागिरी : आगामी विधानसभा निवडणुकीत राजापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी इच्छुक आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अजित विश्वासराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांत स्थानिक नेतृत्व नसल्यामुळेच राजापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत या मतदारसंघातून स्थानिकच उमेदवार असावा. शिवाय महायुतीकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, यासाठी पक्षाकडे मागणी करण्यात आली असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीकडून आपण इच्छुक असून ती संधी आपणाला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या मतदारसंघात अपेक्षित गोष्टी डावलून राजकारण सुरू असून निधीचा पडत असलेला पाऊस तालुक्याच्या समस्या निवारण्यासाठी कमी तर पक्ष कार्यकर्ते आणि ठेकेदार यांचे हित जोपासण्यासाठी जास्त आहे, असा जोरदार आरोप त्यांनी यावेळी केला.

विधानसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजापूर मतदारसंघात इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच संभाव्य उमेदवारीवरून जोरदार स्पर्धा सुरू आहे. महायुतीमध्ये शिवसेनेकडून (शिंदे गट) सिंधुरत्न समितीचे सदस्य आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी उमेदवारीसाठी जोरदार आघाडी उघडली आहे. भाजपकडून मतदारसंघावर जोरदार दावा ठोकण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील मित्र पक्ष राष्ट्रवादीनेदेखील त्यात उडी घेत विधानसभा मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. त्यांनी राजापुरात पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीबाबत भाष्य केले.

ते म्हणाले, राजापूर मतदारसंघाचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांच्या भीषण स्थितीमुळे हा मतदारसंघ खूपच मागे गेला. स्थानिक नेतृत्व नसल्यानेच ही अवस्था झाल्याची टीका करीत त्यांनी विधानसभेला स्थानिकच उमेदवार असावा, यावर भर दिला. महायुतीमधून स्थानिक उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अनेक क्षेत्रात मी कार्यरत असून उमेदवारीची संधी आपल्याला नक्की मिळेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांत मूलभूत समस्या भीषण बनल्या आहेत. प्रश्न सोडविण्यात लोकप्रतिनिधींना अपयश आले. ते पर्यायी उद्योग व्यवस्था आणू शकले नाहीत. या मतदारसंघातील सर्व घटकच वंचित राहिले आहेत. केवळ पाखाड्या आणि कमी अंतराचे रस्ते हाच विकास आहे का, असा सवाल करीत चांगले आणि स्थानिक नेतृत्व नसल्यामुळेच या मतदारसंघाला विकासाच्या प्रतीक्षेत राहावे लागत असल्याची टीका विश्वासराव यांनी केली. निवडणुका आल्या की यांना प्रकल्प आठवतात आणि प्रकल्पाच्या घोषणा केल्या जातात, असेही ते म्हणाले. अपेक्षित गोष्टी डावलून राजकारण केले जात आहे गेले काही दिवस या मतदारसंघात भरघोस निधी दिला जात असून त्याचा वापर गैरसोयी दूर करण्यासाठी कमी आणि समवेत येणारे कार्यकर्ते आणि ठेकेदार यांचे हितच जोपासण्य़ासाठी अधिक केला जात आहे. राजापूर शहराला भेडसावणाऱ्या पूररेषेचा प्रश्न प्रलंबित आहे. या प्रश्नाची तड लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 03/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow