रत्नागिरी जिल्हा बँकेत स्थानिकांना प्राधान्य द्या, अन्यथा बँकेत घुसून बाहेर काढू; संदीप सावंत यांचा इशारा
चिपळूण : रत्नागिरी जिल्हा बँक ही आमची हक्काची बँक आहे. आम्ही जपली, आम्ही वाढवली, संचालक मंडळ देखील आमचेच. मात्र, नोकर भरतीमध्ये गोंधळ करून संदीप कोकणातील स्थानिकांना संधी न देता जर बाहेरील त्यापेक्षा परप्रांतीयांना संधी देणार असाल तर बँकेत घुसून बाहेर काढू, असा गर्भित इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी तालुकाप्रमुख तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी दिला आहे. संपूर्ण जिल्ह्यात जनआंदोलन उभे करू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेसाठी २०० रिक्त पदांची नोकर भरती सुरू करण्यात आली असून त्यासाठी प्रथम ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले. प्रत्येक अर्जासाठी एक हजार रुपये भरून घेण्यात आले. ऑनलाईन भरती असल्याने पूर्ण देशातून अर्ज भरण्यात आले आहेत. सुमारे १४ हजार अर्ज दाखल झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध होत आहे. त्यासाठी पुन्हा ऑनलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन करून काही एजन्सीज नियुक्त करण्यात आले. त्यानुसार रविवारी घरडा कॉलेज, ज्ञानदीप, खेर्डी, देवरुखमधील माने कॉलेज असे परीक्षा केंद्र सावंत निश्चित करून इच्छुकांना बोलवण्यात आले होते. मात्र घरडा सेंटरमध्ये इंटरनेट अभावी उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिले आणि एकच गोंधळ उडाला.
यासंदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी थेट आक्षेप घेतला असून ही प्रक्रिया दिखाऊ असल्याचे म्हटले आहे. ऑनलाईन भरतीचा निर्णय कोणी घेतला व का? याचे उत्तर जिल्हावासीयांना मिळायलाच हवे. परीक्षेत इंटरनेटचा व्यत्यय आणून आर्थिक तडजोड करण्याचा प्रयत्न होत असेल तर सर्व प्रयत्न हाणून पाडू. नोकरीमध्ये जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे. अन्यथा नोकर भरती झाली आणि जिल्ह्याबाहेरचे किंवा परप्रांतीय दिसले तर एकालाही काम करू देणार नाही, असा इशारा संदीप सावंत यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 03/Sep/2024
What's Your Reaction?