रत्नागिरी : आंबेशेत-कर्ला वालमघाटी येथे डोंगरातून घसरलेल्या मोठ्याल्या दगडाला वरच्यावर फोडला; घरांना मिळाली सुरक्षितता
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील आंबेशेत-कर्ला वालमघाटी येथील डोंगरावरचा भला मोठ्ठा दगड डोंगरातच अडकवून फोडण्यात आला. रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, अभियंता यतीराज जाधव आणि मनिष भोंगले यांच्या तत्परतेमुळे या डोंगराखालच्या २० घरांना कायमस्वरूपी सुरक्षितता मिळाली आहे.
वालम घाटी येथील डोंगरावरचा १० बाय ११ फूट व्यासाच्या आकाराचा भला मोठा दगड डोंगरातून सुटून चिकचिकीत मातीत आणि झाडाझुडूपांमध्ये अडकून पडला होता. डोंगराखाली असणाऱ्या वीस घरांना याचा धोका निर्माण झाला होता.
या संदर्भात ग्रामस्थांनी मदत करण्याची विनंती रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाबर यांना केली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून लगेचच योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना न.प.चे बांधकाम अभियंता जाधव यांना करण्यात आल्या.
रत्नागिरीत डोंगरातच दगड फोडण्याचे काम करणारे कारागिर नव्हते. बांधकाम विभागाच्या अभियंत्यानी कामाचे अंदाजपत्रक बनवून जिल्ह्याबाहेरील कारागिरांना हे काम दिले. त्यानुसार त्या कामगारांनी तो भलामोठा दगड दोऱ्यांच्या जाळ्यामध्ये अडकवून तिथेच फोडून टाकला. त्यामुळे डोंगराखालच्या घरांना सुरक्षितता मिळाली. ग्रामस्थांनी रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्यासह अभियंता यतीराज जाधव, मनीष भोंगले यांचे आभार मानले.
या अधिकाऱ्यांनी तेथे उभे राहून हे काम करून घेतले. यामुळे भलामोठा दगड कोसळण्याचा धोका असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 9/11/2024
What's Your Reaction?