रत्नागिरी : चाकरमान्यांचा सुद्धा मिऱ्या एमआयडीसीला विरोध.. बॅनरने वेधले लक्ष
रत्नागिरी : मिऱ्या येथे होऊ घातलेल्या एमआयडीसीला स्थानिकांसह आता गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांनीही विरोध दर्शवला असून, लवकरच येणाऱ्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त मिऱ्या-मुरुगवाडा नाक्यावर पर्यटन आणि शांतता असा बोर्ड लावत शासन शांतता भंग का करीत आहे असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
मिऱ्या येथे पोर्ट एमआयडीसी प्रस्तावित असून याला सडामिऱ्या जाकिमिऱ्यासह सर्वच मिऱ्यावासियांनी विरोध केला आहे. सडामिऱ्यासह ग्रुप ग्रामपंचायत मिऱ्याच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये विरोधाचा ठराव केला. त्यानंतर मुरुगवाड्यापासून सडामिन्यापर्यंतच्या ग्रामस्थांची अलावा याठिकाणी चौकात सभा होऊन आम्हाला एमआयडीसी नकोच असा नारा दिला होता. माजी आमदार बाळ माने यांनीही आपल्या गावात एमआयडीसी नको असल्याचे स्पष्ट केले.
पर्यटनदृष्ट्या हे गाव विकसित करायचे सोडून एमआयडीसी आणण्यामागे कारण काय असा प्रश्न येथील तरुण वर्गाकडून उपस्थित करण्यात येत आहे. मासेमारी, आंबा यावर येथील कुटूंब आपला चरितार्थ चालवत आहेत. पर्यटनदृष्ट्या या गावाचा विकास करण्यात यावा अशी मागणी होत आहे.
गणेशोत्सवासाठी मिऱ्या गावात चाकरमानी दाखल झाले असून, या चाकरमान्यांनीही निसर्गसंपन्न मिऱ्यामध्ये एमआयडीसी नको अशीच भूमिका घेत, स्थानिक ग्रामस्थांना पाठिंबा दिला आहे.
ऐन गणेशोत्सवात मिऱ्या- मुरुगवाडा चौकात २७ सप्टेंबरला येणाऱ्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त ग्रामस्थांकडून बॅनर लावण्यात आला आहे. यावर्षी जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन आणि शांतता... हे घोषवाक्य जागतिक पातळीवर देण्यात आले आहे. तेच घोष वाक्य घेत मिऱ्यामध्ये पर्यटन विकास व्हावा अशी इच्छा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मिऱ्या गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याऐवजी शासन एमआयडीसी आणून शांतता भंग का करीत असल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या बॅनरने रत्नागिरीकरांचे लक्ष वेधून घेतले असून, मिऱ्यासह शहर परिसरात या बॅनरची चर्चा रंगली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 9/12/2024
What's Your Reaction?