मान्सून निर्धारित वेळेत महाराष्ट्रातून निरोप घेणार
नागपूर : सध्या सक्रीय असलेल्या ला-निना वादळाच्या प्रभावामुळे यंदा ऑक्टोबरमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. परंतु, मान्सून निर्धारित वेळेत राज्यातून निघून जाईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.
सर्वसाधारणपणे 15 ऑक्टोबरनंतर मोसमी पाऊस देशातून निघून जातो व दक्षिण भारतातील 5 राज्यात तो ईशान्य किंवा हिवाळी पाऊस या नावाने तो सुरु होतो. ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा काळ सुरू होतो. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात प्रत्यक्षात मान्सून महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरु करतो. म्हणजे साधारण 5 ऑक्टोबरला माघारी परतत असतांना महाराष्ट्राच्या उत्तरेकडे प्रवेशतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत तो महाराष्ट्रातून बाहेर पडतो. याच दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनच्या शेवटच्या आवर्तनाचा पाऊस होत असतो. तसाच पाऊस यावर्षी 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान पडण्याची शक्यता जाणवते. म्हणजेच घटस्थापनेच्या सातव्या दिवसापासून कदाचित महाराष्ट्रात वळीव स्वरूपाच्या मध्यम पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यासोबतच यंदा ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्राच्या कोणत्या भागात सरासरीच्या कमी किंवा जास्त किंवा सरासरी इतका पाऊस पडू शकतो, याचे भाकीत 1 ऑक्टोबरच्या दरम्यानच व्यवस्थित सांगता येईल असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:42 12-09-2024
What's Your Reaction?