कृषी विभागाची भरती प्रक्रिया रखडली
रत्नागिरी : एमपीएससीद्वारे कृषी विभागाच्या २५८ जागांची भरती प्रक्रिया लांबणीवर गेली आहे. कृषिप्रधान देशातील कृषी भरती प्रक्रिया रखडल्याने विद्याथ्यर्थ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षा लांबणीवर गेल्याने राज्यातील जवळपास ५० हजार विद्यार्थी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत.
कृषी विभागात २५८ जागांच्या भरतीसाठी एमपीएससीकडून प्रक्रिया सुरू होती. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाने २०२२ च्या शासन निर्णयाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब न केल्याने एमपीएससीने या जागांचे मागणी पत्र कृषी विभागाला परत पाठवले आहे. त्यामुळे ही भरती लांबणीवर पडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील जवळपास ५० हजार उमेदवार गेल्या दोन वर्षांपासून कृषी विभागाच्या परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. कृषी विभागाची वेळेवर भरती प्रक्रिया होत नसल्याने विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त करुन नुकतेच पुणे येथे आंदोलन केले आहे. तरीही शासनाकडून याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांतून रोष व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, राज्यातून ५० हजार उमेदवार कृषी विभागाच्या परीक्षेची तयारी करत आहेत. त्यामुळे परीक्षेचे वेळापत्रक लवकर जाहीर झाल्यास त्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेल. त्यामुळे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
वेळेत मागणी पत्र न आल्याने विलंब
स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी पुणे येथे केलेल्या आंदोलनवेळी कृषीच्या २५८ जागांबाबत एमपीएससीने स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, २९ डिसेंबर २०२३ रोजी जागांच्या मागणीचे पत्र प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे कृषी विभागातील पदांचा राज्यसेवा परीक्षेच्या जाहिरातमध्ये समावेश करणे शक्य झाले नाही, असे स्पष्टीकरण एमपीएससीने नुकतेच दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:39 PM 9/14/2024
What's Your Reaction?