रत्नागिरी: अरबी समुद्रात रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदराजवळ आलेल्या अमीर या गॅसवाहू जहाजासह कॅप्टनची कस्टम व सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. कागदपत्रांमध्ये काही संशयास्पद आढळल्यास कारवाई केली जाईल, अशी भूमिका सीमा शुल्क विभागाचे सहायक आयुक्त संदीप कृष्णा यांनी व्यक्त केली.
गेले तीन-चार दिवस जयगड बंदराजवळ आलेल्या अमीर या गॅस वाहू जहाजाबाबत हायव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. या जहाजावरील कागदपत्रांची तपासणी व चौकशी सुरक्षा यंत्रणांनी सुरू केली आहे. ओमानवरून जयगड बंदरासाठी निघालेले 1800 मेट्रिक टन एलपीजी गॅसने भरलेले हे जहाज सध्या किनाऱ्यापासून समुद्रात उभे होते. या जहाजाच्या प्रवेशावरून मोठी खळबळ उडाली असली, तरी त्यामागील कारण अत्यंत धक्कादायक आणि रंजक आहे. या जहाजाचे दोन मालक असून, त्यापैकी एकाला हा गॅस भारतात पाठवायचा आहे, तर दुसऱ्या मालकाचा ओढा जहाज पाकिस्तानला नेण्याकडे आहे. मालकांच्या या भारत विरुद्ध पाकिस्तान धोरणामुळे हे जहाज समुद्रातच नांगर टाकून उभे आहे.
ओमानहून निघालेले हे जहाज जयगड बंदरात दाखल होणार होते; परंतु ऐनवेळी दोन मालकांमधील अंतर्गत वाद उफाळून आला. एका मालकाच्या मते हा व्यवहार भारतीय बाजारपेठेसाठी झाला आहे, तर दुसरा मालक हा गॅस पाकिस्तानच्या दिशेने वळवण्याच्या प्रयत्नात आहे. या वादाचा थेट परिणाम जहाजाच्या कायदेशीर कागदपत्रांवर झाला आहे. बंदरात प्रवेश करण्यासाठी आणि मालाची उतरवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी महत्त्वाची कागदपत्रे या मालकी हक्काच्या वादामुळे पूर्ण होऊ शकलेली नाहीत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 29-04-2026














