पावसामुळे रस्त्याची दुरावस्था; तांत्रिक तपासणी करून कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी
संगमेश्वर तालुक्यातील मेघी-देवळे रस्त्याची अक्षराश: चाळण झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना दररोज नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
अपघाताचा धोका अन् चौकशीची मागणी
पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली असून अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याची प्रत्यक्ष सखोल पाहणी करावी, तांत्रिक तपासणी करावी आणि कामाच्या गुणवत्तेबाबत चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
माहिती फलक आणि पारदर्शकतेवर प्रश्न
या रस्ता कामाबाबत आवश्यक माहिती फलक लावण्यात आला आहे का? कामाची अंदाजित किंमत किती, मुदत कोणती, ठेकेदार कोण आणि कोणत्या निधीतून ही तरतूद केली आहे, याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे भविष्यात कोणताही अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. तसेच कामाची गुणवत्ता तपासून दोष आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी अथवा ठेकेदाराविरुद्ध नियमानुसार कडक कारवाई करावी, यासाठी प्रशासनाला निवेदन सादर केले जाणार आहे. केवळ कागदोपत्री कामे न दाखवता प्रत्यक्षात दर्जात्मक रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:23 25-08-2026














