ई-केवायसी आणि छाननीमुळे लाभार्थ्यांची संख्या २.४७ कोटींवरून १.६५ कोटींवर
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या जुलै महिन्याच्या हप्त्याचे १,५०० रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधन सणापूर्वीच निधी वितरण सुरू झाल्याने राज्यातील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. सामाजिक न्याय विभागाकडून ३४४ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वितरित झाल्यानंतर हे हस्तांतरण करण्यात आले आहे.
ई-केवायसी प्रक्रियेमुळे ९२ लाख महिलांच्या नावांची छाटणी
योजना सुरू झाली तेव्हा लाभार्थी महिलांची एकूण संख्या २ कोटी ४७ लाख इतकी होती. मात्र, राज्य सरकारने लागू केलेली ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यामुळे सुमारे ६२ लाख महिलांची नावे या याजीतून वगळण्यात आली आहेत. उत्पन्न मर्यादा ओलांडणे, सरकारी नोकरी असणे आणि एकाच कुटुंबातून अनेक अर्ज असणे यांसारख्या विविध कारणांमुळे एकूण ९२ लाखांनी ही संख्या घटली असून, सध्या ई-केवायसी पूर्ण केलेल्या पात्र लाभार्थ्यांची संख्या १ कोटी ६५ लाख उरली आहे.
अपात्र लाभार्थ्यांवरील खर्चावरून जयंत पाटील आक्रमक
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आरटीआय (RTI) माहितीचा संदर्भ देत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जून २०२६ पर्यंत सुमारे ९२ लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ९,६०५ कोटी रुपये जमा झाल्याचा दावा करत त्यांनी प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. योजना लागू करण्यापूर्वी अर्जांची योग्य छाननी का झाली नाही आणि हजारो कोटी रुपयांच्या या नुकसानीला जबाबदार कोण, असा थेट सवाल त्यांनी शासनाला विचारला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 26-08-2026














