कोणत्याही नाराजीशिवाय केवळ वयोमानाचे कारण देत राजीनामा; ‘सामान्य शिवसैनिक’ म्हणून काम सुरूच ठेवण्याचा संकल्प
रत्नागिरी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील किंवा संघटनेतील कोणत्याही नाराजीचा उल्लेख न करता, केवळ वयोमान आणि नवीन तरुण नेतृत्वाला संधी मिळावी या उदात्त हेतूने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात इतर पदाधिकाऱ्यांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर सावंत यांचा हा निर्णय राजकीय वर्तुळात कौतुकाचा विषय ठरला आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी, राजापूर-लांजा आणि चिपळूण-संगमेश्वर या तीन विधानसभा क्षेत्रांसाठी प्रसाद सावंत यांची जिल्हा युवा अधिकारी (जिल्हाप्रमुख) म्हणून नियुक्ती केली होती. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तिन्ही मतदारसंघांत दौरे करून संघटनात्मक आढावा घेतला होता आणि युवासैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले होते. त्याआधी त्यांनी दोनदा युवासेना तालुकाप्रमुख आणि रत्नागिरी शहर संघटक म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली होती.
‘तरुण कार्यकर्त्याला संधी मिळावी’ – प्रसाद सावंत आपल्या राजीनामा पत्रात प्रसाद सावंत यांनी स्पष्ट केले आहे की, वयोमानानुसार युवासेनेतील हे पद खऱ्या अर्थाने तरुण कार्यकर्त्याकडे असायला हवे. त्यामुळे आपण स्वतःहून ही जबाबदारी सोडत असून पक्षाने एखाद्या तरुण, तडफदार कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी वरिष्ठांकडे केली आहे.
सामान्य शिवसैनिक म्हणून पक्षकार्य सुरूच राहणार पद सोडले असले तरी शिवसेना संघटना वाढीसाठी आपले प्रयत्न थांबणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय विद्यार्थी सेनेच्या कॉलेज उपाध्यक्षापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास शिवसेना उपविभाग प्रमुख, तालुकाप्रमुख, शहर संघटक ते जिल्हाप्रमुख पदापर्यंत राहिला आहे. अनेक आंदोलनांत सक्रिय सहभाग घेणारे, बेधडक व निडर युवाप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख असून यापुढेही एक सामान्य शिवसैनिक म्हणून पक्षाचे काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 03-09-2026














