अभिजीत दीपके आणि अरविंद केजरीवाल यांच्यात ‘डील’ झाल्याचा आरोप
CJP Split News : कॉकरोच जनता पार्टीमध्ये (CJP) मोठी फूट पडली असून मूळ आंदोलनाशी जोडलेल्या कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडली आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही आता पूर्णपणे अरविंद केजरीवाल यांची पार्टी बनली आहे, असा गंभीर आरोप करत मनीष ब्रह्मभट्ट (Manish Brahmbhatt) यांनी गुरुवारी (३ सप्टेंबर) ‘कॉकरोच जनता पार्टी डेमोक्रेटिक’ (CJP Democratic) च्या स्थापनेची अधिकृत घोषणा केली.
अहमदाबादच्या मनीष ब्रह्मभट्ट यांचा जंतर-मंतर आंदोलनात सहभाग
अहमदाबादचे रहिवासी असलेले मनीष ब्रह्मभट्ट यांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सीजेपी आंदोलनानंतर सर्व काही विकले गेले आणि ही केवळ ‘टीम केजरीवाल’ बनून राहिली आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच दीपके यांनी आपल्या टीममध्ये मित्रांचा आणि मैत्रिणींचा भरणा केल्याचा आरोपही ब्रह्मभट्ट यांनी केला आहे.
“घरी बसून १२ लोकांची टीम बनवली”: मनीष ब्रह्मभट्ट यांचे आरोप
अभिजीत दीपके यांच्यावर थेट निशाणा साधत ब्रह्मभट्ट म्हणाले, “अभिजीत दीपके यांनी घरी बसून १२ लोकांची टीम तयार केली. यासाठी कोणत्याही मूळ कार्यकर्त्याला किंवा आंदोलनाशी जोडलेल्या लोकांना बोलावण्यात आले नाही. या पदांसाठी काय निकष लावले गेले? त्यांनी आम आदमी पार्टीशी (AAP) जोडलेल्या आठ लोकांना, स्वतःच्या मैत्रिणींना आणि कॉलेजच्या मित्रांना यात जोडले आहे.”
आम्हाला प्रत्येक राज्यातून ५ प्रतिनिधी हवे होते, जेणेकरून कोणीही हुकूमशहा किंवा ‘राजा’ बनून निर्णय घेणार नाही. परंतु ही मागणी फेटाळून लावून मनमानी कारभार सुरू करण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले.
“केजरीवाल यांनी अभिजीत दीपकेसोबत डील केली”
अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना ब्रह्मभट्ट म्हणाले, “ही टीम बनवण्याची मूळ कल्पना अरविंद केजरीवाल यांचीच होती. ते सुरुवातीपासूनच फसवणूक करत आले आहेत. जेव्हा अण्णा हजारे यांचे आंदोलन सुरू झाले, तेव्हा त्यांनी अण्णांचा वापर करून स्वतःचा राजकीय फायदा करून घेतला.”
ते पुढे म्हणाले, “केजरीवाल यांनी पक्ष स्थापन करताना जनता सांगेल त्याला तिकीट देऊ आणि स्वराज आणू, असा दावा केला होता. पण सत्ता आल्यावर त्यांनी स्वराज कायदा बाजूला सारला. आता पुन्हा एकदा उभारलेले आंदोलन यशस्वी झाल्यावर केजरीवाल यांनी अभिजीत दीपके यांच्यासोबत डील करून हे आंदोलन हायजॅक केले आहे.”
“मुस्लिम आणि शिख चेहऱ्यांना स्थान नाही”
आपच्या लोकांना सीजेपी पक्षात समाविष्ट करण्यासाठीच सर्व तडजोडी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सीजेपीच्या नव्या कार्यकारिणीत एकाही मुस्लिम पुरुषाला किंवा शिख प्रतिनिधीला स्थान देण्यात आले नाही, असा आरोप करत ब्रह्मभट्ट यांनी सीजेपीच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या कारणांमुळेच वेगळा पक्ष स्थापन करावा लागल्याचा दावा त्यांनी केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:26 03-09-2026














