चिपळूण : परशुराम नगर परिसरात गढूळ पाणी; राष्ट्रवादीकडून स्वच्छ पाणीपुरवठ्याची मागणी
चिपळूण : शहरातील परशुराम नगर आणि परिसरात दुर्गंधीयुक्त आणि गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पालिकेने नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे निवेदनाद्ववारे केली आहे.
शहरातील परशुराम नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठ्याचा विषय गाजतो आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे येथील पालिकेची जलवाहिनी फुटली. महामार्गालगत सातत्याने जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत आहेत. या जलवाहिन्या फुटल्यानंतर त्याची त्वरित दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, त्याचा फटका परिसरातील नागरिकांना बसतो आहे. जलवाहिनी फुटल्याने गेले काही दिवस परशुराम नगरमधील पाणीपुरवठा बंद होता. परिणामी, येथील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. त्यानंतर जलवाहिनीची दुरुस्ती झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला; परंतु सध्याच्या स्थितीला येथील नागरिकांना गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. परिणामी, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात आणि नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे करण्यात आली. त्यानुसार मुख्याधिकाऱ्यांनी दखल घेत दोन दिवसांत स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा आदिती देशपांडे, रिहाना बिजले, शिवानी पवार, रविना गुजर, शमिना परकार, मनाली जाधव, पूनम भोजने आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 13/Jun/2024
What's Your Reaction?