रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे ९१ लाखांचे नुकसान, तिघांचा मृत्यू
रत्नागिरी : जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला असून, विविध घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत. घरे, गोठे, सरकारी व खासगी मालमत्तांचे सुमारे ९१ लाख ५३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. १२५ कुटुंबांना आतापर्यंत स्थलांतरित करण्यात आले आहे.
रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथे पिंपळाचे झाड कोसळून तिघे जखमी झाले होते. या तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातील लक्ष्मीकांत वेदरे यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ६ रोजी सायंकाळी घडली होती.
प्रतीक मयेकर आणि गुरुनाथ भाटकर हे जखमी झाले आहेत. चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे कापशी नदीत बुडून शनिवारी सायंकाळी ७ वा. श्रावणी सुधीर मोहिते या १५ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. तिसरा बळी दापोली तालुक्यात पालगड कोंडी नदीच्या पात्रात युवराज यशवंत कोळुगडे यांचा गेला आहे.
जिल्ह्यात ३७ कच्चा घरांचे अंशतः व पूर्णतः असे सुमारे १६ लाख ३२ हजार ५४५ रुपयांचे नुकसान झाले, तर पक्क्या घरांमध्ये अंशतः व पूर्णतः असे ७६ घरांचे २६ लाख ८१ हजार ३१६ रुपयांचे नुकसान झाले आहे. अंशतः व पूर्णतः असे २९ गोठ्यांचे सुमारे १३ लाखांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १९ सार्वजनिक मालमत्तांचे ३२ लाख ५७ रुपयांचे, तर खासगी ७ मालमत्तांचे २ लाख ९५ हजारांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात पुरामध्ये ५९ कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यात आले असून, १९८ व्यक्तींचा समावेश आहे, तर दरडीमुळे ६६ कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यात १४१ व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:02 09-07-2024
What's Your Reaction?