रत्नागिरी : शिक्षक भरतीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी पूर्ण
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेला पुन्हा नव्याने झालेल्या शिक्षक भरतीतील उमेदवारांच्या कागद पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ३६७ शिक्षकांपैकी २७ शिक्षकांनी या पडताळणीला दांडी मारली आहे. यामुळे आता ३४० शिक्षक मिळणार हे निश्चित झाले आहे. येत्या १० दिवसांत या शिक्षकांना शाळा मिळणार आहे.
जिल्हा परिषद शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारली आहे. हे गेल्या चार-पाच वर्षात दिसत आहे. गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेमध्ये रत्नागिरी जिल्हा हा राज्यात अव्वळ ठरला होता. मात्र रिक्त पदांची संख्या वाढत निघाल्याने शैक्षणिक कारभार चालवताना जि. प. प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. चालू वर्षी आंतरजिल्हा बदल्या तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या संख्येमुळे जवळपास २ हजार पदं रिक्त होती. मात्र शासनाने १ हजार पदे भरण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार मे महिन्यात ९९७ शिक्षकांची भरती झाली. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाला दिलासा मिळाला होता.
ही भरती झालेली असतानाच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा ३६७ शिक्षकांना पवित्र पोर्टलवरून भरती करण्याचा निर्णय शासनाने बेतला. त्यानुसार या शिक्षकांची कागदपत्र पडताळणी मंगळवार, बुधवारी जि. प. भवनात आयोजित करण्यात आली होती. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. २७ उमेदवार गैरहजर राहिले, त्यामुळे ३६७ पैकी ३४० शिक्षक पात्र ठरले आहे. आता या उमेदवारांसाठी समुपदेशन आयोजित करण्यात येणार आहे. यानंतर त्यांना शाळा देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण होणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.
आंतरजिल्हा बदली प्रतीक्षेतच
दरवर्षी आंतरजिल्हा बदलीचा विषय चर्चेत व वादात असतो. गतवर्षी तर ७०० शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने रातोरात परजिल्ह्यात कार्यमुक्त करण्यात आले होते आणि हा विषय गाजला होता. यावर्षी मात्र जि.प. प्रशासनाने सावध भूमिका घेत यावर्षी पात्र असलेल्या ३५० शिक्षकांना अद्याप तरी न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शिक्षक अजूनही प्रतीक्षेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 12/Jul/2024
What's Your Reaction?