खेड : जगबुडी इशारा पातळीवर स्थिर
खेड : गेले दोन दिवस पावसाने जोरदार बॅटिंग करत चांगलीच दाणादाण उडविली होती. त्यामुळे जगबुडी आणि नारंगी नदीला पूर येऊन खेड बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले होते. रात्री पावसाचा जोर ओसरल्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. सोमवारी सकाळी सहानंतर बाजारपेठेतील पाणी ओसरले. त्यामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांनी तत्काळ चिखल आणि साचलेला कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्याच्यादृष्टीने उत्तम भूमिका बजावली.
दापोली-मंडणगड, आंबवली खाडीपट्ट्याकडे जाणारे जवळपास सर्वच मार्ग बंद होते. काही ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी आले तर काही ठिकाणी पूल खचणे, रस्ते खचणे अशा घटना घडल्यामुळे रविवारी (ता. १४) दुपारी १२ वाजल्यानंतर तालुक्यातील जवळपास सर्वच वाहतूक ठप्प झाली होती. पावसामुळे खेड बाजारपेठेत सुमारे १२ तासांहून अधिक पुराचे पाणी होते. रविवारी संध्याकाळी चारनंतर जगबुडी नदीच्या पाणी पातळीने सर्व रेकॉर्ड मोडत ११ मीटरची उंची गाठली होती. दुपारनंतर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. प्रशासनाच्यावतीने शहरातील विविध ठिकाणच्या अंगणवाड्या, प्राथमिक शाळा, समाजमंदिरे या ठिकाणी पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. महामार्गही ठप्प झाला होता; परंतु पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्यासह बांधकाम विभागाचे अभियंता नीलेश पावसे यांनी घटनास्थळी जाऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याच्यादृष्टीने परिश्रम केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 16/Jul/2024
What's Your Reaction?