Ratnagiri : आक्षेपार्ह पोस्टसाठी 8830404650 संपर्क करा
◼️ जिल्ह्याला असणाऱ्या ऐतिहासिक वारस्याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी
◼️ ऐक्य, संवादातून शांतता आणि सलोखा अबाधित ठेवण्याची सर्वांची जबाबदारी : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला एक ऐतिहासिक वारसा आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक समाजसुधारकांमुळे जिल्ह्याचे देशात नाव आहे, आदर आहे. त्याची प्रेरणा घेऊन सर्वांनी पुढे जायला हवे. ऐक्य आणि सुसंवाद यामुळे सर्व प्रश्न सुटतात. शांतता आणि सलोखा अबाधित ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आगामी सण उत्सव, येणारी विधानसभा निवडणूक, नजिकच्या जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यातील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आज झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस उपअधिक्षक निलेश माईणकर, पोलीस निरीक्षक शैलेजा सावंत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, समाजमाध्यमांचा चांगल्यासाठी वापर केला तर, ते समाजासाठी फायद्याचे आहे. परंतु, काही समाजकंटक नकारात्मक पोस्ट पाठवत असतात. ते समाजासाठी घातक आहे. त्यामुळे कोणत्याही पोस्टची खात्री झाल्याशिवाय ती पुढे पाठविणे हे धोकादायक असते. जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वच समाजाच्या प्रतिनिधींनी सकारात्मक पाऊले उचलली आहेत. शासन प्रशासन आपल्या सोबत आहे. सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. परंतु, एका विशिष्ट मर्यादेनंतर प्रशासनालाही कठोर पाऊले उचलावी लागतात. असा प्रसंग येऊ नये, यासाठी सर्वांनी टिम वर्क म्हणून काम करुया.
'डीपफेक' युगात सजग आणि जागृत रहा - पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी
सध्याचे 'डीपफेक' युग आहे, त्यामुळे अतिशय खोटं समाजमाध्यमातून पसरवलं जात आहे. अशा प्रकारच्या नॅरेटिव्ह अफवांविषयी समाजाने विशेषत: युवा वर्गाने सजग आणि जागृत असले पाहिजे. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट विरोधात सायबर सेलच्या 8830404650 आणि कोणत्याही मदतीसाठी डायल 112 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.
पोलीस विभागामार्फत 24 तास सोशल मीडिया मॉनिटर केला जात असतो. बऱ्याच प्रकरणात तरुण वर्ग मोठा असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबत त्यांच्या पालकांना बोलावून सांगण्यात येते. काहींच्यावर कारवाही देखील झाली आहे. मोकाट जनावरांमुळे 4 वर्षात 21 अपघात झाले आहेत. त्यात 8 जणांचा मृत्यू, 7 जण कायमस्वरुपी जायबंदी झाले आहेत. तर, 21 जनावरे दगावली आहेत. मोकाट जनावरांची काळजी घ्यायला समाजाने पुढे यायाला हवे. काही छुप्या रस्त्यांवरुन अप्रिय घटना, आक्षेपार्ह तस्करी होत असेल तर, डायल 112 वर संपर्क साधावा. जिल्ह्यात काही दिवासांपूर्वी गोवंश अवयव सापडलेल्या प्रकाराबाबत तसेच विशाळगड प्रकरणाबाबत जिल्ह्यात शांतता, सामंजस्य आणि सलोखा ठेवण्यात सर्व समाजांनी पुढाकार घेतला. खरं तर अभिनंदनाचे श्रेय हे त्या सर्वांचे आहे, असेही श्री. कुलकर्णी म्हणाले.
जिल्हा प्रशासन, पोलीस तसेच पुर्णगड ग्रामस्थांचा अभिनंदनाचा ठराव
आजच्या बैठकीमध्ये विशाळगड तसेच जिल्ह्यातील घडलेल्या प्रसंगाबाबत पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने अत्यंत चांगली परिस्थिती हाताळली. आपत्ती व्यवस्थापनही उत्तम करुन नुकसान भरपाई, सानुग्रह मदत केली त्याबद्दल पोलीस अधीक्षक, पोलीस विभाग, जिल्हा प्रशासन यांचा अभिनंदनाचा ठराव सदस्य गजानन पाटील यांनी मांडला. त्याला सर्वांनी उचलून धरत पाठींबा दिला. त्याचबरोबर पूर्णगड येथे विठ्ठल मंदिरामार्फत श्री विठ्ठलाचा सोहोळा कार्यक्रम केला होता. त्याचवेळी अजान सुरु झाल्याने वाद्य वाजवणे थांबविले. हा आदरभावनेचा, एकात्मतेचा प्रसंग सांगून सदस्य महमद बिजापुरी यांनी त्या सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी मांडला.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. जिल्हा प्रशासनाने केलेल्या कार्यवाही सविस्तर तपशिल प्रास्ताविकामध्ये सांगितला.
युयुत्सु आर्ते, मुकेश गुंदेचा, पत्रकार हेमंत वणजू, दत्तात्रय शिंदे, मुसद्दिक मुकादम, अझीम होडेकर, राहूल पवार आदी यावेळी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:06 23-07-2024
What's Your Reaction?