सरकारच्या योजना घराघरात पोहोचवा : पालकमंत्री उदय सामंत
गणपतीपुळे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी विविध कल्याणकारी आणि लोकहिताच्या योजना आणल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या योजना सर्वांनी घराघरात पोहोचवा, असे आवाहन महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. तसेच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत महिलांना दिली जाणारी पंधराशे रुपयांची भेट अर्थात दोन महिन्यांची रक्कमही येत्या रक्षाबंधन सणाला महिलांना देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी मालगुंड येथे केली.
मालगुंड मच्छी मार्केटजवळ एका सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मालगुंड ग्रामस्थांबरोबर संवाद या कार्यक्रमात ते शुक्रवारी सायंकाळी बोलत होते. या कार्यक्रमात सामंत यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबद्दल माहिती देताना महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणल्याचे सांगितले. तसेच महिलांना आपले कुटुंब सांभाळताना खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणीतून एखादी महिला सक्षम व्हावी आणि आर्थिक नियोजनाला हातभार लावावा या उद्देशाने ही योजना आणून प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये भेट म्हणून महाराष्ट्र सरकारने देण्याची योजना आणली आहे. या योजनेचा सर्व महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी आमचे सरकार आणि कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. राजू साळवी, माजी जि. प. सदस्या साधना साळवी, ग्रा. पं. सदस्य अमित पाटील, युवा कार्यकर्ते रोहित मयेकर आदी उपस्थित होते. तर या कार्यक्रमात सामंत, प्रांताधिकारी जीवन देसाई, ठाणे येथील त्यांचे कार्यकर्ते मोरे, बाबू म्हाप, गजानन पाटील, प्रकाश साळवींसह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजू साळवी यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 31/Jul/2024
What's Your Reaction?