ऑगस्टच्या सुरुवातीलाच रत्नागिरीत दमदार पावसाची हजेरी
रत्नागिरी : पावसाच्या दोन महिन्यांत अडीच हजार मि. मी.ची सरासरी गाठल्यानंतर गुरुवारपासून कोकण किनारपट्टी भागात पुन्हा जोरदार पावसाने सक्रियता दाखवून ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार सलामी दिली. गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच दमदार सरींना सुरुवात झाली. सरत्या आषाढातही झोडपून काढणाऱ्या पावसाची आता श्रावणातही दमदार हजेरी लागण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अरबी सागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा, त्याला चक्रीय वाऱ्याची जोड असल्याने पुढील तीन दिवस रत्नागिरीसह अन्य किनारी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे रत्नागिरीसह रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवस 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. गेले काही दिवस उसंत घेतलेला पाऊस बुधवारी रात्रीपासून पुन्हा कोसळू लागला. त्यामुळे पुन्हा एकदा खेड तालुक्यातील जगबुडी नदीतील जलस्तर इशारा पातळी ओलांडून झेपावला आहे. अन्य नद्या मात्र नियंत्रित असल्या तरी जोरदार पावसाने नद्यांमधील जलस्तर पुन्हा वाढला आहे.
गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण केली होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला पावसाने उसंत घेतल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधून वाढलेला जलस्तर कमी झला. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती नियंत्रणात आली. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. बुधवारी रात्रीही जोरदार पाऊस झाला. गुरुवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार सरींची बरसात केली. मात्र, त्यात सातत्य नव्हते.
गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ३७.८० मि.मी.च्या सरासरीने एकूण ३४०२० मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड तालुक्यात २५ मि. मी., दोपोलीत २८.६०, खेड ३६.७०, गुहागर ३१.३०, चिपळूण ४२.६०, संगमेश्वर ४४, रत्नागिरी ३२.२०, लांजा ५०.७० आणि राजापूर तालुक्यात ४९.१० मि.मी. पावसाची नोंद झाली.
बुधवारी आणि गुरुवारी खेड तालुक्यात अनुक्रमे ५६.७० आणि ३६.७० असा तब्बल १०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील जगबुडी नदीतील जलस्तर पुन्हा पाचव्यांदा इशारा पातळीकडे झेपावला आहे. जिल्हा आपत्ती नियंत्रण विभागाच्या सकाळी ११ वाजताच्या नोंदीनुसार जगबुडी नदीचा भरणे नाका येथील जलस्तर इशारा पातळी ओलांडून १.७० मीटरने उंचावला होता. जगबुडी नदीची इशारा पातळी ५ मीटरवर असून सकाळी ११ वाजता भरणे नाका येथील जलस्तर ५.७० मीटर नोदविला गेला.
जून आणि जुलै या दोन पावसाळी महिन्यात समाधानकारक वाटचाल केल्यानंतर पाऊस आता ऑगस्ट महिन्यातही सक्रीय झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने २५८४ मि.मी. ची सरासरी गाठली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 02/Aug/2024
What's Your Reaction?